Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 28 December, 2010

मंदिर चोर्‍यांचा छडा लागत नसेल तर भाजप रस्त्यावर उतरणार

आर्लेकर यांचा खणखणीत इशारा
वास्को, दि. २७ (प्रतिनिधी): गेल्या १५ महिन्यांत गोव्यातील साठहून जास्त धार्मिक स्थळांत झालेल्या चोरीच्या प्रकरणामुळे गोमंतकीयांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या आहेत. त्या रोखणे कॉंग्रेस सरकारला जमत नसल्यास मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी पदांचा राजीनामा देऊन घरी बसावे, असा खणखणीत इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिला.
यावेळी वास्को भाजप युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नार्वेकर व सुरेश नाईक उपस्थित होते. जर सरकारने याप्रश्‍नी त्वरित पावले उचलली नाहीत तर भाजप रसत्यावर उतरण्यास मागेृ-पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.विविध धार्मिक स्थळांतून झालेल्या चोर्‍यांतून एक कोटीहून जास्त रकमेचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवल्याचे सांगताना आर्लेकर यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. पोलिस मात्र हातावर हात ठेवून स्वस्थ असल्याचा आरोप आर्लेकर यांनी केला. गोव्याची सुरक्षा कशी ढासळली आहे याची अनेक उदाहरणे जनतेसमोर असल्याने ती नव्याने सांगण्याची गरज नाही. अटाला व दुदू यांना निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यात राज्याचे गृहमंत्री व्यस्त असल्याचा आरोप आर्लेकर यांनी केला.
मुख्यमंत्री यासंदर्भात कोणतीही पावले उचलत नाहीत. लोकांच्या भावना दुखावल्या असल्याच तरी त्याबद्दल त्यांना ना खंत ना खेद, असेही आर्लेकर यांनी बोलून दाखवले. राज्यातील पोलिस यंत्रणाही निष्क्रिय बनल्याचा आरोप त्यांनी केला.

No comments: