Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 28 December, 2010

माझ्यावरील आरोप आकसातून

डॉ. साळकरांच्या आरोपांवर नार्वेकरांचा ‘युक्ति’वाद
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): आपल्या मुलाचा जन्म पर्वरी येथील ‘चोडणकर नर्सिंग होम’ येथे २८ फेब्रुवारी १९९३ रोजी झाला. त्याच्या जन्माची नोंद पिळर्ण पंचायतीत झाली नाही हे आपल्याला एका वर्षानंतर कळले. आपल्या पत्नीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राला त्या स्वतः उत्तर देतील. राहिला प्रश्‍न आपला मुलगा ‘पॉली उम्रीगर विभागीय क्रिकेट स्पर्धे’त सतत तीन वर्षे खेळण्याचा. हा प्रश्‍न ‘जीसीए’ व ‘बीसीसीआय’चा अंतर्गत मामला आहे, अशा भाषेत माजी कायदेमंत्री तथा हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.
आज पर्वरी येथील ‘जीसीए’अकादमीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ऍड.नार्वेकर यांनी, डॉ. शेखर साळकर यांनी केलेले आरोप आकसातून असल्याचा आव आणला. गणेशराज नार्वेकर हा उमदा खेळाडू आहे, त्याला विनाकारण या प्रकरणात गोवून त्याची कारकीर्द खराब करण्यापेक्षा डॉ. साळकर यांनी आपल्याला थेट सवाल करावे, असे आव्हानही नार्वेकर यांनी दिले.
डॉ. साळकर यांना आपण ‘जीसीए’तून बडतर्फ केले होते. त्याचा राग धरूनच ते आपल्याविरोधात आरोप करीत सुटले आहेत. या प्रकरणात आम्हा सर्वांचे निर्दोषत्व चौकशीअंती स्पष्ट होईल. आपल्या मुलाची जन्मनोंदणी उशिरा केली हा गुन्हा असेल तर अशी ३० ते ४० हजार प्रकरणे आपण सादर करू शकतो, त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंद करा, असे ते म्हणाले. आपल्या पत्नीने १९९५ साली मुलाचा जन्मदाखला नोंदणी करण्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राला त्या चौकशी अधिकार्‍यांसमोर काय तो जबाब देतील,अशी सावध भूमिकाही त्यांनी घेतली. सतत तीन वर्षे विभागीय क्रिकेट स्पर्धेत भाग घेतल्याचा विषय हा ‘जीसीए’ व ‘बीसीसीआय’चा अंतर्गत मामला आहे. त्याबाबत सवाल करण्याचा कुणालाच अधिकार नाही.‘जीसीए’चा कारभार सचिव सांभाळतात. त्यावेळी चेतन देसाई हे सचिव होते व तेच याचे उत्तर देतील. अशा चुका केल्यावरून यापूर्वी चेतन देसाई यांना ‘जीसीए’कडून दंडही ठोठावण्यात आल्याचे नार्वेकर म्हणाले.
राजीनामा सादर करू
‘जीसीए’ची आपण ३० दिवसांत तातडीची सर्वसाधारण बैठक बोलावणार आहे. या बैठकीत ‘जीसीए’ च्या सदस्यांसमोर आपली बाजू मांडणार व राजीनामाही सादर करणार असल्याचेही ते म्हणाले. हा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला असेल,असे ते म्हणाले.
कलम १२० पासून सावधान
भारतीय दंड संहितेच्या १२० कलमानुसार कटकारस्थानाचा गुन्हा याप्रकरणी नोंदवलेल्या सरकारला ऍड. नार्वेकर यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. डॉ. साळकर यांच्याप्रमाणे इतरही अनेकजण विविध प्रकरणी या कलमाअंतर्गत तक्रार करू शकतात. पोलिस व ड्रगमाफिया साटेलोटे प्रकरणात खुद्द गृहमंत्री व उपअधीक्षकांविरोधातही ही तक्रार नोंद होऊ शकते, असेही नार्वेकर म्हणाले.

No comments: