Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 15 November, 2010

'चर्चिलच्या धमक्यांना भीक घालत नाही'

-महामार्ग फेरबदल कृती समिती अधिक आक्रमक
-हा तर महाघोटाळाच!

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): महामार्ग फेरबदल आंदोलकांच्या विरोधात अरेरावीची भाषा बोलणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या धमक्यांना आणि इशाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही. राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणेच गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण हा एक मोठा घोटाळा असून येणाऱ्या काळात या सर्वांवर घरी बसण्याची वेळ येणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण आराखडा बदल कृती समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मडगाव येथील लोहिया मैदानावर या आराखड्याच्या विरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल आणि हे पाऊल अधिक तीव्र असेल,असे श्री. देसाई यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा करून आल्यानंतर चर्चिल आलेमाव यांनी या महामार्गाच्या रुंदीकरण आराखड्याला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा न काढल्यास आपण हा विषय लावून धरणार असल्याची वल्गना करणारे चर्चिल आलेमाव स्वतःला मुख्यमंत्र्यापेक्षा श्रेष्ठ समजत आहेत का, असा प्रश्न करून चर्चिल यांनी आपण कायद्यापेक्षा वर असल्याचे समजल्यास त्यांना त्याचे गंभीर परिणाम नजीकच्या काळात बघायला मिळणार असल्याचेही श्री. देसाई यावेळी म्हणाले.
बांधकाम मंत्री आलेमाव यांची ही केवळ दादागिरी आहे. या दादागिरीला आम्ही भीक घालीत नाही. हे आंदोलन या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे लोकांची घरे जात असल्यानेच पेटलेले आहे. चर्चिल आलेमाव कोणाच्या जिवावर निवडून आले आहेत, हे त्यांनी विसरू नये. या जनतेनेच त्यांना मतदान करून निवडून आणले आहे. सरकारकडे अद्याप महामार्गाच्या रुंदीकरणाला आराखडा तयार नाही. सरकार जनतेला अंधारात ठेवून हा महामार्ग करू पाहत असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. काही ठिकाणी ३५ मीटर तर, काही ठिकाणी ४५ मीटर रुंदीकरण करणारा असल्याचे श्री. आलेमाव सांगत आहेत, पण या रुंदीकरणाचा आराखडा कुठे आहे, असा सवाल श्री. देसाई यांनी केला आहे. हा आराखडा लोकांना दाखवल्याशिवाय हे रुंदीकरण करता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

No comments: