Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 14 November, 2010

२-जी स्पेक्ट्रम घोटाळा लिलाव करण्यासंबंधीच्या सूचनांना केराची टोपली!

माजी दूरसंचार सचिवांचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली, दि. १३ : २-जी स्पेक्ट्रमच्या लिलावात झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरत असतानाच, स्पेक्ट्रमच्या लिलावासंबंधी आपण सादर केलेल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा गौप्यस्फोट दूरसंचार खात्याचे सेवानिवृत्त सचिव डी. एस. माथूर यांनी आज केला. माथूर यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे ए. राजा यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
"स्पेक्ट्रमची संख्या कमी असल्याने मर्यादित संख्येतच परवान्यांचे वाटप करण्यात यावे', अशीही सूचना मी माझ्या कार्यकाळात केली होती, असे माथूर यांनी आज भोपाळ येथून वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. परवाने वाटपाच्या काही आठवडे अगोदर १२१ कंपन्यांना ४.४ मेगॅ हर्टझच्या स्पेक्ट्रमचे कसे काय वाटप करण्यात आले याबाबत वक्तव्य करण्यास मात्र माथूर यांनी नकार दिला. राजा यांनी हा निर्णय कसा काय घेतला याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याने याबाबत वक्तव्य करणे उचित ठरणार नाही, असेही ते म्हणाले.
त्यावेळी दूरसंचार खात्याकडे सुमारे ५०० पेक्षा जास्त अर्ज आले होते. मात्र, एवढ्या अर्जदारांना वाटण्याइतपत स्पेक्ट्रम त्यावेळी उपलब्ध नव्हते, असेही माथूर यांनी पुढे सांगितले. टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांची एकतर्फी सत्ता मोडीत काढत नवनवीन कंपन्या या क्षेत्रात येऊन स्पर्धा वाढावी या प्रयत्नात यशस्वी झाल्याचा दावा ए. राजा सातत्याने करत आहेत. २००१ च्या दरानुसार २००८ मध्ये २-जी स्पेक्ट्रमचे परवाने वाटल्याने सरकारचा सुमारे १.४० लाख कोटींचा महसूल बुडाल्याचा ठपका राजा यांच्यावर ठेवण्यात आला आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय.

'व्होट बॅंके'च्या राजकारणामुळे दहशतवादाविरुद्धचा लढा बोथट
भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांचे प्रतिपादन

बऱ्हाणपूर, दि. १३ : कॉंग्रेसच्या व्होट बॅंकेच्या राजकारणामुळे देशाचा दहशतवादाविरुद्धचा लढा बोथट झाला आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे.
"कॉंग्रेस पक्षाच्या या घाणेरड्या राजकारणामुळे देशाचे हित धोक्यात आले आहे आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे', असे अडवाणी यांनी येथे काल रात्री ब्रिजमोहन मिश्रा स्मृती व्याख्यानमालेत बोलताना सांगितले. २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी अतिरेकी संसदेत प्रवेश करण्यात यशस्वी झाले असते तर ९/११ पेक्षाही मोठी भयंकर घटना घडू शकली असती, असेही अडवाणी पुढे म्हणाले.
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या भाजप सरकारने नक्षलग्रस्त भागात शिक्षणाच्या सोयींसह एकूणच विकास कार्य केल्यामुळे स्थानिक जनतेचा नक्षलवाद्यांवरचा विश्वास कमी झाला आहे आणि त्यामुळेच नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पामेला अँडरसन बिग बॉसमध्ये
मुंबई, दि. १३ : हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री पामेला ऍण्डरसन पुढल्या आठवड्यात कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या रिऍलिटी शोमध्ये दाखल होणार आहे.
"येत्या सोमवारी पामेला ऍण्डरसनचे अमेरिकेतून मुंबईत आगमन होईल आणि पुढल्या आठवड्यात ती बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल', असे कलर्स वाहिनीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. "बिग ब्रदर' या ब्रिटिश रिऍलिटी शोवर आधारित असलेल्या बिग बॉस या रिऍलिटी शोचे चित्रीकरण येथून १२५ किमी अंतरावर असलेल्या लोणावळा येथे करण्यात येत आहे. या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना बाहेरच्या जगाशी कुठलाही संपर्क न करता अनेक कॅमेऱ्यांच्या नजरेत एकाच घरात एकत्र वास्तव्य करावे लागते.

No comments: