Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 14 November, 2010

विरोध मोडून महामार्गाचे काम पुढे रेटणारच : चर्चिल

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग १७ च्या रुंदीकरणाच्या आराखड्याची आखणी सुरू असून चालू महिन्यापर्यंत ती पूर्ण होणार आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करताना लोकांची जास्त घरे जाणार नाहीत याबाबत दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी संबंधित सर्व आमदार, पंचायतींना विश्वासात घेऊनच आखणी करण्यात येणार आहे. त्यानंतर जरी कोणीही विरोध केला तरी हे काम सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी म्हटले आहे. यावेळी बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता जे. जे. एस. रेगो उपस्थित होते.
आपण अनेक वर्षांपासून दिल्ली आणि गोवा विधानसभेतही राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) व राष्ट्रीय महामार्ग १७ साठी आवाज उठवत होतो; परंतु गोव्यातील कोणत्याच मंत्र्यांने वा आमदाराने त्याकडे लक्ष दिले नाही. केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने तो आराखडा तयार केलेला होता. त्यात हजारो घरे पाडली जाणार होती. त्याला आपण स्वत: विरोध करून गोव्यातील अभियंत्याकडून नवे सर्वेक्षण केले व आराखडा तयार केला. गोव्यात दोन्ही महामार्गाचे रुंदीकरण तात्काळ होणे हे गरजेचे असून भविष्यातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आताच काम सुरू करणे गरजेचे आहे, असे आलेमाव यांनी सांगितले. काही लोक महामार्गाला विरोध करत असल्याबद्दल आलेमाव यांनी खेद व्यक्त केला.
महामार्ग ४ (अ) ची आखणी केली असून कित्येक ठिकाणी ५० टक्के रुंदी कमी केलेली आहे. ६५ किलोमीटर रस्त्याच्या आखणीबाबतीत विरोध असून तेथे ३० ते ३५ किंवा ४५ मीटर रुंदीचा रस्ता बनवण्यात येणार आहे. आताच्या आराखड्यानुसार ५६९ बांधकामांपैकी १३६ घरे मोडली जातील. पोळे ते पेडणे पर्यंत ४ टोलनाके उभारण्यात येतील. एक पोळे सीमेजवळ, दुसरा झुआरी पुलाजवळ, तिसरा मांडवी पुलाजवळ बसवण्यात येणार आहे.
दक्षिण गोव्यातील लोकांना पणजीला जाण्यासाठी एकच टोलनाका लागेल व मासिक पास त्यांना देण्यात येणार आहे. आठवड्यातून एकदा पणजीला जाणाऱ्यांना कमी टोल भरण्यासाठी आखणी केली जात असल्याचे मुख्य अभियंता रेगो यांनी सांगितले.

No comments: