Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 16 November, 2010

बहुसंख्य शिरगाववासीय मूर्खच आहेत काय?

कोमुनिदाद उपाध्यक्ष लक्ष्मण येसू गांवकर यांचा सवाल
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): शिरगाव कोमुनिदाद समितीने चौगुले खाण कंपनीकडे करार करून ७० हजार चौरसमीटर जागा आपल्या ताब्यात घेण्याचा जो करार केला आहे, त्याला बहुतांश ३७५ गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. केवळ १४ लोकांनी गैरसमज करून घेऊन या कराराला विरोध दर्शवला आहे. कोमुनिदादने शिरगाव खाण उद्योजकांच्या घशात घातल्याचा आरोप करून झाल्यानंतर आता दिवाणी खटला का दाखल केला जात नाही, असा सवाल करणाऱ्यांनी यापूर्वी कोमुनिदादचा ताबा कित्येक वर्षे त्यांच्याकडे होता तेव्हा काय प्रयत्न केले, याची माहिती दिली तर अधिक चांगले होईल, असा टोला कोमुनिदादचे उपाध्यक्ष लक्ष्मण येसू गांवकर यांनी लगावला.
खाण उद्योगामुळे संपूर्णतः उध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या शिरगाववासीयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शिरगाव कोमुनिदादची लाखो चौरसमीटर जागा चुकीच्या पद्धतीने चौगुले व बांदेकर खाण उद्योजकांच्या नावे लागल्याने मोठ्या प्रमाणात या जागेचा वापर खाण उद्योगासाठी बेकायदेशीररीत्या सुरू आहे. याप्रकरणी कोमुनिदाद प्रशासन व महसूल खात्याचाही खाण कंपनीला छुपा पाठिंबा आहे. प्रशासकीय व न्यायमंडळासमोर न्यायासाठी गेली कित्येक वर्षे हेलपाटे मारूनही कुणीही शिरगाववासीयांच्या मदतीला धावून येत नाही. आता शिरगाव कोमुनिदादकडूनच आपली जमीन परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असताना काही मोजक्याच लोकांनी त्यात खो घालणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल, असेही श्री. गांवकर म्हणाले.
कोमुनिदादकडून करण्यात आलेल्या या कराराला सरकारची मान्यता घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोमुनिदाद ही खाजगी संस्था आहे व ती कोमुनिदाद आचारसंहितेनुसारच चालते. कोमुनिदादच्या सगळ्या गावकऱ्यांनी बहुमताने एखादा निर्णय घेतला तर सरकार काहीच करू शकत नाही. सरकारला कोमुनिदादचे व शिरगाववासीयांचे काहीच पडून गेलेले नाही, अन्यथा या गावात कोमुनिदादच्या जमिनीत खाण उद्योगाला परवानगी देण्याचे पाप त्यांनी केलेच नसते, असे कृष्णा राया गांवकर यांनी सांगितले.
आजपर्यंत कोमुनिदाद, देवस्थान, पंचायत आदींवर काही ठरावीक लोकच सत्तेत होते व त्यांनी शिरगावच्या भवितव्याबाबत विशेष काळजी घेतली नाही. म्हणूनच त्याचे गंभीर परिणाम आता आम्हा शिरगाववासीयांना भोगावे लागतात. २००४ साली शिरगाव नागरिक समिती स्थापन झाल्यानंतर तब्बल २६ वर्षांनंतर शिरगावच्या बेरोजगारांना खाण कंपनीत रोजगार मिळाला. काही लोकांनी केवळ खाण कंपनींच्या तालावर नाचूनच विविध कामांत केवळ अडथळे निर्माण करण्याचेच काम केले. आता तरी निदान सर्व गावकऱ्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे व शिरगावच्या हिताच्या या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही कृष्णा गांवकर यांनी केले आहे.

No comments: