Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 19 November, 2010

५ फोन कंपन्यांचे परवाने रद्द करा

नवी दिल्ली, दि. १८ : स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्या दूरसंचार कंपन्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करीत दूरसंचार नियंत्रकने (ट्रायने) २००८ मध्ये ज्या कंपन्यांना परवाने दिले आहेत अशा पाच कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. एटिसलात (स्वान) युनिनॉर व व्हिडिओकॉनसह पाच कंपन्यांना देण्यात आलेले ६२ परवाने रद्द करावेत, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
२२ पर्यंत बिग बॉस रात्री ९ वाजताच
मुंबई, दि. १८ : "कलर्स' चॅनेलवर "बिग बॉस' या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने दिलासा मिळाल्याने तूर्तास २२ नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम ठरल्यावेळी म्हणजे रात्री नऊ वाजताच दिसणार आहे.
केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात कलर्स चॅनेलने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता कोर्टाने या निर्णयाला सोमवार २२ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
राखीला दिलासा नाही
मुंबई, दि. १८ : राखी सावंतने केेलेल्या अपमानास्पद बोलण्यामुळे झाशी येथील एका युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राखी सावंतचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे "राखी का इन्साफ' या कार्यक्रमाच्या प्रसारणाला न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी राखी सावंतला मात्र दिलासा मिळालेला नाही.
उपराष्ट्रपतींना मातृशोक
नवी दिल्ली, दि. १८ : उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या मातोश्री आसिया बेगम अन्सारी यांचे आज पहाटे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबीय सूत्रांनी सांगितले. ९६ वर्षीय आसिया बेगम यांनी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये पहाटे १.३० च्या सुमारास शेवटचा श्वास घेतला.
दिल्ली, मुंबईत रेड अलर्ट जारी
पुणे : अतिरेकी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली आणि मुंबईमध्ये आज गुरुवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

No comments: