Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 15 November, 2010

खाण कंपनीविरोधात दिवाणी खटला दाखल का करीत नाही!

लढा शिरगांवच्या अस्तित्वाचाच
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): शिरगांव कोमुनिदादच्या मालकीची ४ लाख १७ हजार चौरसमीटर जागा चौगुले खाण उद्योग व १४ लाख ५० हजार चौरसमीटर जागा बांदेकर खाण उद्योगाच्या नावे चुकीच्या पद्धतीने लागली आहे. या जमिनीचा मालकी हक्क कोमुनिदादकडे आहे, ते सिद्ध करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करतानाच "ऍडवर्स पोझेशन' चा दावा करणाऱ्या खाण कंपनीविरोधात दिवाणी खटलाच दाखल करा, अशी आग्रही मागणी शिरगावचे एक रहिवासी दिलीप भास्कर गांवकर यांनी केली आहे.
शिरगांव कोमुनिदाद समितीतर्फे अलीकडेच चौगुले खाण कंपनीकडे केलेल्या करारावरून गावांत दोन गट तयार झाले आहेत. बहुतांश गावकरी कोमुनिदादच्या पाठीमागे असले तरी १४ गावकऱ्यांनी या कराराला विरोध करून त्याला आव्हानही दिले आहे. मुळात विरोधकांची संख्या कमी असली म्हणून ते पूर्णपणे चूक करीत आहेत असा समज कुणीही करू नये. शिरगांवच्या अस्तित्वाच्या चिंतेनेच या लोकांनी या कराराला विरोध दर्शवला आहे, असे दिलीप गांवकर म्हणाले. या कराराप्रमाणे ४ लाख १७ हजार चौरसमीटर जागेत चौगुले कंपनीला खनिज उत्खनन करण्याचे हक्क दिले आहेत व त्या बदल्यात ही कंपनी सुमारे ७० हजार चौरसमीटर जागा कोमुनिदादच्या ताब्यात रीतसर देण्यास राजी झाली आहे. जी ७० हजार चौरसमीटर जागेची गोष्ट कंपनी करीत आहे, त्यात अधिकतर जागेचा चौगुले कंपनीच्या खनिज वाहतुकीसाठीच वापर होतो व या कंपनीकडूनच ती व्यापण्यात आली आहे. या वापरात अजिबात हस्तक्षेप करण्यात येणार नाही,असेही समितीने मान्य केले आहे व त्यामुळे ही जागा ताब्यात घेऊन उपयोग काय. या कराराबाबत कोमुनिदाद प्रामाणिक आहे, असे जरी समजता येण्यासारखे असले तरी केवळ व्यवहार पाहणारी खाण कंपनी किती प्रामाणिक असेल, याबाबत शंकाच आहे, असेही श्री.गांवकर म्हणाले.
शिरगावातील काही गावकऱ्यांचा या कराराबाबत गैरसमज झाल्याचे कोमुनिदादकडून सांगण्यात येते. हा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी समितीचीच होती. विरोध करणाऱ्यांनी पैसे कसे काय घेतले,असे म्हटले जाते. पैसे घेतले म्हणजे आपल्या गावावर तुळशीपत्र ठेवले असे होत नाही. आजतागायत गावच्या भल्यासाठी म्हणून भासवून अनेकांनी आपला वैयक्तिक स्वार्थ खाण उद्योजकांकडून साधून घेतला आहे, याची अनेक उदाहरणे लोकांसमोर आहेत व त्यामुळे कुणावर विश्वास कसा ठेवावा, हेच लोकांना कळत नाही. चौगुलेनंतर आता यापुढे तशाच प्रकारचा करार बांदेकर खाण उद्योग कंपनीबरोबर करण्याचा कोमुनिदादचा इरादा आहे. या करारात सुमारे १ कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी घेतले जाण्याचीही शक्यता आहे. प्रत्येक गावकऱ्याला २२ हजार रुपये मिळणार आहेत. हे पैसे या कराराला विरोध करणाऱ्यांमुळे अडकले आहेत,असा प्रचार करून विरोधकांविरोधात लोकांना भडकावण्याचे प्रकार सुरू आहेत, अशी माहितीही दिलीप गांवकर यांनी दिली.
शिरगाव कोमुनिदाद समितीला खरोखरच गावचे भले करावयाचे असेल व शिरगावातील भावी पिढीसाठी हा गाव शाबूत ठेवायचा असेल तर त्यांनी थेट या कथित जागेवरील मालकी हक्कासाठी खाण कंपनीविरोधात दिवाणी खटला दाखल करावा. या लढ्याला सर्व गावकऱ्यांचा पाठिंबा असेल. मुळात खाण कंपनीकडून गावातील सुमारे पन्नास जणांना रोजगार दिला आहे हे जरी खरे असले तरी या पिढीचे भविष्यच नष्ट होते आहे याबाबत त्यांच्यात जागृती व्हायला हवी. हे कामगार अधिकतर कंत्राटी पद्धतीवर काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत तोडो व फोटो नीती वापरूनच खाण कंपनींकडून या गावचा उध्वस्थ केला व यापुढेही हेच सत्र सुरू राहील. प्रशासन व न्यायसंस्थेलाही पैशांच्या मदतीने आपल्या बाजूने ओढण्यात खाण कंपनींना यश मिळाले आहे. दुर्दैव म्हणजे शिरगाववासियांची भक्कम बाजू न्यायालयात मांडून अनधिकृतपणे बळकावलेली कोमुनिदादची जमीन खाण कंपनीकडून परत मिळवण्यासाठी जे वकील नेमण्यात आले ते देखील खाण कंपनींचीच तळी उचलून धरतात व कोमुनिदादला हक्क मिळवून देण्याचे सोडून खाण कंपनी व कोमुनिदादचे मध्यस्थी असल्यागत वागतात याचेही श्री.गावकर यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले.

No comments: