पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): पणजी येथील कला अकादमीच्या कृष्ण कक्षात आज (दि. १६) आयोजित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिन सोहळ्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार शरद तेंडुलकर व अरुण भातखंडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माहिती संचालक मिनीन पेरीस, माहिती सचिव तथा विकास आयुक्त नरेंद्र कुमार, टाइम्स ऑफ इंडियाच्या कायदा संपादक स्वाती देशपांडे, "गुज'चे अध्यक्ष प्रकाश कामत व सचिव सुदेश आर्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. कामत यांनी समई प्रज्वलित करून पत्रकार दिन सोहळ्याचे उद्घाटन केले. लोकशाहीत प्रसिद्धी माध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या घटनेचे वृत्तांकन करताना प्रसिद्धी माध्यमांनी सावधगिरी बाळगावी; तसेच एकमेकांशी समन्वय साधून बातम्या प्रसिद्ध कराव्यात, असे प्रतिपादन यावेळी बोलताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना शरद तेंडुलकर यांनी सांगितले की, आपला हा सत्कार म्हणजे आपण गेली ४० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याची पोचपावती आहे. पूर्वी वर्तमानपत्रांत होणाऱ्या चुका गंभीरपणे घेतल्या जायच्या परंतु, आता वाचक सुज्ञ झाल्यामुळे ते बातमीत असलेल्या चुका सुधारून वाचतात, असेही ते म्हणाले.
स्वाती देशपांडे यांनी "प्रसारमाध्यमांचे जागतिकीकरण ः स्पर्धा, आव्हाने आणि संधी' या विषयावर बीजभाषण करताना सांगितले की, प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध होणारे वृत्त जनमत तयार करत असते. म्हणून लोकांपर्यंत चुकीचे वृत्त जाणार नाही याची काळजी प्रसिद्धी माध्यमांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रकाश कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मिनीन पेरीस यांनी सरकारने पत्रकार कृतज्ञता निधी व बिनव्याजी कर्ज योजना तसेच लॅपटॉप आदी योजना पत्रकारांच्या कल्याणासाठी राबवल्याची माहिती दिली. प्रतिमा आचरेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सुदेश आर्लेकर यांनी आभार मानले.
दरम्यान, पत्रकार दिनानिमित्त संध्याकाळी मॅकानिझ पॅलेस येथे स्वाती देशपांडे यांचे महिला पत्रकारांसाठी मार्गदर्शनपर बीजभाषण झाले.
Wednesday 17 November, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment