Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 September, 2010

वृत्तवाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

अयोध्या निकाल
नवी दिल्ली, दि. १८ : अयोध्या येथील रामजन्मभूमीच्या मालकी हक्काच्या निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच स्तरातून यासाठी तयारी सुरू असून, वृत्तवाहिन्यांनी निकालाबाबत आधीच कुठलेही अनुमान काढू नये आणि १९९२ मधील बाबरी ढाचा उद्ध्वस्त होण्याची दृश्ये वारंवार दाखवू नयेत, यासाठी न्यूज ब्रॉॅडकास्टर्स असोसिएशनने आज काही मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली आहे.
अयोध्या वादावरील निर्णय हा अतिशय संवेदनशील मुद्दा असल्याने या बाबतीत वृत्त प्रसारित करत असताना जास्ती काळजी घेण्याची गरज आहे. या निर्णयाबाबतचे वृत्त प्रसारित करत असताना त्यामध्ये खळबळ माजवणारे, चिथावणीखोर किंवा उत्तेजक असे कुठलेही वक्तव्य असू नये, असे असोसिएशनतर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यासंबंधी देण्यात येणाऱ्या प्रत्येक बातमीतून सामाजिक सलोखा कायम राहील, याकडे जातीने लक्ष देण्यात यावे. असे झाल्यास जनतेचे योग्य मत तयार करण्यासाठी त्याची मदत होईल. यासाठी न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वी त्यासंबंधी कुठलेही अनुमान काढू नये आणि न्यायालयाच्या निकालानंतरही जनक्षोभ उसळेल असे काहीही दाखवू नये, असेही यामध्ये म्हटले आहे.
न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी १९९२ च्या घटनेची दृश्ये वारंवार दाखवू नये आणि निकालानंतर देशभरात कुठेही जल्लोष किंवा रोष प्रकट करण्याच्या कुठल्याही घटनांचे चित्रीकरण वाहिन्यांनी दाखवू नये. या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.

No comments: