Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 September, 2010

'वाळपईत उमेदवाराची लवकरच घोषणा'

वाळपई, दि. २१ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघात २०० कोटींची विकासकामे केल्याचा दावा आरोग्यमंत्री करत असले तरी येथील मार्केट, बसस्थानक आदी समस्या अद्याप सोडवण्यात आलेल्या नाही. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वाळपईचे विद्रुपीकरण सुरू असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाळपई पोटनिवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. यासाठी तीन नावांची शिफारस करण्यात दिल्ली येथे करण्यात आली असून लवकरच उमेदवारी जाहीर होईल, असे भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यांनी सांगितले. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला गोविंद पर्वतकर यांच्यासह नरहरी हळदणकर, देमू गावकर, नारायण गावस, संतोष हळदणकर उपस्थित होते.
संतोष हळदणकर, नारायण गावस व नरहरी हळदणकर यांच्या नावांची शिफारस दिल्ली येथे करण्यात आली आहे. लवकरच उमेदवाराचे नाव उघड केले जाणार, असल्याचे प्रा. पर्वतकर यांनी सांगितले.
पैशाच्या जोरावर सर्व कामे होतील, या भ्रमात असलेल्या कॉंग्रेसला यावेळी जनता योग्य धडा शिकवणार, असा विश्वास व्यक्त करताना प्रा. पर्वतकर यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाळपईत पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्याची संधी मतदारांना मिळाल्याचे सांगितले.
एकाच घरातील दोन व्यक्तींना तिकीट देण्याचे कॉंग्रेसचे धोरण नाही, असे जाहीर करत असतानाच पक्षाने सभापती प्रतापसिंह राणे यांचे पुत्र विश्वजित राणे यांना उमेदवारी जाहीर करून स्वार्थासाठी नियम धाब्यावर बसवून घराणेशाहीला वाव देत असल्याचा आरोप श्री. हळदणकर यांनी केला. धावे, नगरगाव, सोनाळ, सावर्डे या ठिकाणी खाण व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जात असून येणाऱ्या काळात येथील जनतेला खाण प्रदूषणाला सामोरे जावे लागणार आहे. जमिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपने आखलेल्या योजनेला बगल देत कॉंग्रेसने हा प्रश्न असाच कायम ठेवण्यास प्राधान्य दिले आहे, असेही ते म्हणाले.

No comments: