Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 13 July, 2010

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण वादावर तोडगा - चर्चिल

शक्य असेल तेथेच सहापदरी ः अन्यत्र चारपदरी वा मार्गआखणीत बदल
मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) : गोव्यातून जाणाऱ्या उभय राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते व या महामार्गांबाबत नियुक्त केलेली सल्लागार संस्था यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आज येथे घेतली. रुंदीकरणाबाबत होत असलेल्या विरोधाबाबत चर्चा करून रुंदीकरणामुळे सर्वाधिक बांधकामे पाडाव्या लागणार असणाऱ्या चिंचोणे, शिरदोण , पर्वरी, खोर्ली, उसगाव, भोम, चिंबल, गोरोठी, मोले आदी भागात मार्गआखणी बदलण्याचा निर्णय घेतला.
बैठकीनंतर मंत्री चर्चिल आलेमाव यांनीच ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, या बैठकीतील निर्णयानुसार जेथे सहजपणे शक्य असेल तेथेच महामार्गाची रुंदी ६० मीटर ठेवली जाईल. अन्य ठिकाणी ती ४५ मीटर ठेवली जाईल. या महामार्गाची लोकांना कमीतकमी झळ पोहोचावी हा यामागे उद्देश होता. त्यासाठी रुंदी ३० मीटर ठेवण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला; पण प्राधिकरण तयार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बांधकामांना झळ बसणाऱ्या भागात ती बांधकामे वांचविण्यासाठी मार्ग आखणीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र या बदलामुळे व जमीन संपादन या सोपस्कारांत व रुंदीकरण कामात विलंब होणार नाही का, असे विचारता त्यांनी त्याचा इन्कार केला. संबंधित अधिकाऱ्यांना तशी सक्त ताकीद दिल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले मोले व अन्य काही भागात या आखणीबदलामुळे वनराई कापावी लागणार असल्याने वनखात्याचा दाखला आवश्यक असून त्यांनी तो लगेच देण्याची तयारी दर्शवली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकल्प ठरल्या वेळेत पूर्ण केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
तळपण , गालजीबाग पुलांचा शिलान्यास यंदाच होईल. तसेच जुवारी पुलाचे कामही यंदाच सुरू केले जाईल. काणकोणात गालजीबाग, तळपण खेरीज माशे खाडीवर तिसरा पूल येणार आहे; पण हे सर्व पूल पूर्वींच्या आराखड्याप्रमाणे होतील. कारण तेथे कोणताही मार्गबदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले, या राष्ट्रीय महामार्गांची आखणी केली जात असताना लोक गप्प राहिले. त्यावेळी विरोध केला नाही. आता प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असता विरोध करू लागले. त्यामुळे आपण आपल्या पातळीवर केंद्रीय नेत्यांशी भांडून हा बदल करून घेतल्याची माहिती दिली.
बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे ए. के. माथूर व सुभाष पटेल , सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता श्री. रेगो व अन्य वरिष्ठ अभियंते उपस्थित होते. त्या सर्वांनी काही महत्त्वाच्या जागांनाही आज भेटी दिल्या व पाहणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार प्राधिकरणाने उभय मार्गांसाठी निविदाही बहाल केलेल्या असताना आता हा बदल खरोखरच शक्य आहे काय, असा सवाल केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोळे-पत्रादेवी या १२२.०६ कि. मी. लांबीच्या "टोल रोड प्रकल्पा'साठी nvrll indus projects या हैदराबादच्या कंपनीची ३१०० कोटींची निविदा स्वीकारलेली असून हे कंत्राट २३ वर्षांच्या "बांधा वापरा व हस्तांतरीत करा तत्वा'वर आधारले आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या कंत्राटात जुवारी नदीवरील ९०० मी. लांबीच्या केबल स्टे पुलाचा अंतर्भाव राहाणार आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मुख्य कमान ५०० मीटरची, तर अन्य २ कमानी प्रत्येकी २०० मीटरच्या असतील. मुख्य कमानीच्या खांबांची उंची १३० मी. असेल.
या महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत राहील तर जुवारी पूल २४ वर्षांत पूर्ण करावा लागेल अशी अट आहे.१२२ कि. मी. लांबीतील ३६.९२ कि. मी. भाग सहापदरी तर ८९.१० कि. मी. भाग चारपदरी करावयाचा आहे. तो पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र व कर्नाटक ही राज्ये गोव्याच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत.

No comments: