Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 17 July, 2010

"सध्या सत्ता आमच्या हातात असल्याने जे वाटते ते करू'

विश्वजित राणे यांची दर्पोक्ती

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - म्हापसा येथील जिल्हा इस्पितळासंदर्भात सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, भाजपला जे वाटते ते त्यांनी करावे. मात्र सध्या सत्ता आमची आहे व त्यामुळे आम्हाला जे वाटते तेच आम्ही करू, अशी दर्पोक्ती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे.
सदर जिल्हा इस्पितळाच्या सल्लागार मंडळ नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत हे इस्पितळ सुरू होणे शक्यच नाही. "पीपीपी' व खाजगी भागीदारीनेच ते सुरू होईल. त्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला.
आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांनी छेडले असता त्यांनी ही माहिती दिली. आपण अजिबात मग्रुरीने वागलो नाही, असे म्हणत प्रा. पार्सेकर व इतरांचा आपण नेहमीच आदर करतो, अशी भाषा त्यांनी वापरली. सध्याचे आझिलो इस्पितळ नव्या वास्तूत हलवणे शक्य नाही. जिल्हा इस्पितळ सुरू करण्यास पुरेसे डॉक्टर व तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. हे इस्पितळ सर्व साधनसुविधांनी युक्त करायचे झाल्यास आणखी ४० ते ५० कोटी रुपयांची गरज आहे. फक्त फीत कापून व पाटी लावून उद्घाटन करण्यात आपल्याला अजिबात स्वारस्य नाही. जनतेचा जीव धोक्यात घालणे आपल्याला मान्य नाही,अशी माहितीही त्यांनी दिली.
सल्लागार मंडळाची निवड करण्याचेच आश्वासन आपण विधानसभेत दिले होते.उच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात दुरुस्ती करून सरकारने हे इस्पितळ सुरू करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रक्रियांची माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: