Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 17 July, 2010

वेगळा आरोग्यमंत्री हवाच कशाला ?

दक्षिण गोवा भाजपचा सवाल

मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी) : म्हापसा येथील जिल्हा इस्पितळासंबंधी भाजपने केलेल्या मागणीला उद्देशून आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी भाजप आमदारांसंबंधी केलेल्या विधानांना जोरदार आक्षेप घेताना दक्षिण गोवा भाजप समितीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पाहाणीसाठी मुख्यमंत्र्यांना जर इस्पितळांना वारंवार भेट द्यावी लागत असेल, तर वेगळा आरोग्य मंत्री हवाच कशाला, असा सवाल दक्षिण गोवा भाजपचे सरचिटणीस रुपेश महात्मे यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केला. विश्वजित राणे यांच्यावर कठोर टीका करताना, त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे आरोग्य खात्याबरोबरच कृषी खातेही आहे, पण त्यांचे या दोन्ही खात्यांवर अजिबात लक्ष नाही. वर्षातून सहा महिने ते विदेशातच असतात व त्यामुळे ते एकप्रकारे अनिवासी भारतीय बनलेले आहेत.
त्यांना सर्वसामान्यांच्या आरोग्याची चिंता नाही, जिल्हा इस्पितळ यावर्षी सर्व सुविधांनी पूर्ण होईल असे आश्वासन त्यांनी दिलेले होते पण ते अजून झालेले नाही व त्यामागील कारण त्याचे खासगीकरण करण्याचा त्यांनी चालविलेला विचार आहे, असा दावा त्यांनी केला. गोव्यातील एकाही सरकारी इस्पितळाचा कारभार व्यवस्थित चालत नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याच सुविधा नाहीत. हॉस्पिसीयो इस्पितळ व काणकोण आरोग्य केंद्राचा कारभार स्वत: मुख्यमंत्री पाहत आहेत. दररोज तेथील अहवाल घेत आहेत, हॉस्पिसियोत वरचेवर जाऊन सुधारणााचा आढावा घेत आहेत, मुख्यमंत्र्यांनी जर हे काम करावयाचे झाले तर वेगळा आरोग्यमंत्री कशाला हवा, असा सवाल त्यांनी केला व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून आरोग्य खाते काढून स्वत:कडे ठेवावे, असे सांगितले.
वाळपई मतदारसंघ म्हणजे सर्व गोवा असा समज करून घेतलेल्या विश्वजित राणे यांना शेष गोव्याची कोणतीच चिंता नाही ही वस्तुस्थिती आहे. नावेली व परिसरातील लोकांना आरोग्य दाखला घेण्यासाठी कुडतरी येथे जावे लागते व लाच दिल्याशिवाय काम होत नाही असे सांगून पावसाळी आजार झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिसियोत आणल्यास त्यांना जी वागणूक मिळते, त्यावरून विश्वजित यांच्या हायटेक आरोग्य सुविधांच्या वल्गना किती फोल आहेत ते दिसून येते, ते म्हणाले.
कृषी खात्यातर्फे नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकेका मंत्र्यांची अशाप्रकारची कामगिरी पाहिल्यास मुख्यमंत्र्यांचा आताच खरा घुस्मटमार होत आहे असे वाटते असे सांगून विश्वजित राणे यांच्याकडील दोन्ही खाती काढून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेस सिद्धनाथ बुयांव हेही उपस्थित होते.

No comments: