Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 14 July, 2010

चौकशीची मागणी करणाऱ्यांना आता 'सीआयडी'कडून पाचारण

सुनील कवठणकरांना समन्स
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): पोलिस आणि ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणी गृहमंत्र्यांच्या पुत्राच्या कथित संबंधाबाबत लकी फार्महाऊस हिने पर्दाफाश करणारी मुलाखत दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेल्या सीबीआय चौकशीची मागणी मान्य करण्याऐवजी त्यासंदर्भात आवाज उठविणाऱ्यांची सतावणूक करण्याचे नवे धोरण पोलिस खात्याने अवलंबिल्याचे आज उघड झाले. या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या "एनएसयूआय' या कॉंग्रेसच्या विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष सुनील कवठणकर यांना गुन्हा अन्वेषण विभागाने उद्या चौकशीसाठी पोलिस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात पोलिस आणि ड्रग माफियांशी असलेल्या संबंधाच्या विरोधात "एनएसयूआय'ने सध्या सह्यांची जोरदार मोहीम राबवली असून ती कॉंग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरली आहे.
"सीआयडी'ने केवळ आमच्यावर दबाव आणण्यासाठीच मला चौकशीसाठी बोलावले आहे, असा आरोप सुनील कवठणकर यांनी केला आहे. आम्ही पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे यासंबंधी तक्रार करणार असल्याचे कवठणकर यांनी सांगितले. तसेच, उद्या दुपारी ४ वाजता जबानी देण्यासाठी सीआयडीच्या कार्यालयात हजेरी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्तापर्यंत २० हजार विद्यार्थ्यांनी या निवेदनावर सही केली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच येत्या शुक्रवारी दिल्ली येथे पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली "एनएसयुआय'ची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यावेळी आम्ही हे निवेदन त्यांना सादर करणार आहोत. तसेच पोलिसांनी सुरू केलेल्या तबाव तंत्राचीही माहिती त्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक याचे सुपुत्र रॉय नाईक यांचे संबंध ड्रग माफियांशी असल्याचे आरोप झाल्याने सध्या या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. काही दिवसांपूर्वी श्री. कवठणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा पोकळ तपासकाम करून संशयित पोलिसांना जामिनावर सोडण्यासाठी व्यवस्थित काळजी घेतल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांवर केला होता व या अधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा नोंद करण्याची मागणीही केली होती. तसेच अमली पदार्थाचे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले जात असल्याने या प्रकरणातील संशयित असलेल्या पोलिसांना पुन्हा त्वरित अटक करण्याचीही मागणी करण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून कवठणकर यांनाच गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशी करण्यासाठी पाचारण केले आहे. प्रकरण चिरडण्यासाठीच हा दडपशाहीचा प्रकार असल्याचा आरोप कवठणकर यांनी केला आहे. दरम्यान अमलीपदार्थ प्रकरणावरून सध्या राज्यात वातावरण चांगले तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशीची करण्याची मागणी राजकीय पक्ष आणि संघटनांकडून सध्या केली जात आहे.
------------------------------------------------------------------
माझी नव्हे, लकीची जबानी घ्या!
पोलिसांना माझी जबानी घेऊन काय करायचे आहे, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करून या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची साक्षीदार असलेले लकी फार्महाऊस हिची जबानी नोंद करून घेण्यास कुचराई करणाऱ्या पोलिसांनी आधी लकी हिची जबानी नोंद करून घेतल्यास बरेच सत्य बाहेर येईल, असेही कवठणकर यांनी यावेळी सांगितले. "एनएसयूआय' मार्फत सुरू करण्यात आलेली सह्यांची मोहीम रोखण्यासाठीच पोलिसांचे हे दबाव तंत्र असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments: