Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 17 July, 2010

आरोग्यमंत्र्यांना समज देणार

संतप्त भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे व त्यामुळे मंत्री म्हणून वावरत असताना लोकप्रतिनिधींचा अवमान करणे त्यांना अजिबात शोभत नाही. उत्तर गोव्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ ताबडतोब सुरू होणे गरजेचे आहे. मात्र ही मागणी धुडकावून लावत हे इस्पितळ सुरू करणार नाही व हवे तर ३६५ दिवस उपोषण करा, अशी बेताल भाषा वापरून त्यांनी जनतेचा अपमानच केला आहे. अशा मग्रूर मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी आग्रही मागणी भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केली. दरम्यान, भाजप शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्री कामत यांनी घेतली असून विश्वजित राणे यांना योग्य ती समज देण्याचे आश्वासन त्यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले.
भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री कामत यांची आल्तिनो येथील सरकारी बंगल्यावर भेट घेतली. यावेळी भाजप विधिमंडळ उपनेते व म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर, मयेचे आमदार अनंत शेट व साळगावचे आमदार दिलीप परूळेकर हजर होते. म्हापशातील नव्या जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणाला भाजपचा ठाम विरोध असेल, असेही यावेळी प्रा.पार्सेकर यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले. सामान्य लोकांच्या हितासाठी भाजपने या सुसज्ज इस्पितळाची उभारणी केली होती व तिथे सरकारी इस्पितळच असावे, असेही ठासून सांगितले. गेली दोन वर्षे हे इस्पितळ सुरू करण्यावरून आरोग्यमंत्र्यांची टोलवाटोलवी सुरू आहे. उच्च न्यायालयातही सरकारने हे इस्पितळ ३० जुलै २००९ रोजी सुरू करण्याचे लेखी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. एवढे करूनही हे इस्पितळ सुरू होत नसल्याने भाजपने १५ ऑगस्टपूर्वी ते सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र उत्तर गोव्यातील लाखो लोकांच्या मागणीचा अनादर करून १५ ऑगस्टपर्यंत इस्पितळ सुरू होणार नाही, हवे ते करा, अशी गुर्मीची भाषा वापरून विश्वजित राणे यांनी आपल्या मर्यादेचे उल्लंघन केल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. विश्वजित राणे यांनी आपल्या असभ्य वर्तनामुळे त्वरित माफी मागावी,अशी मागणीही भाजपने केली आहे.
नव्या इस्पितळांत उपकरणे खरेदी करण्यात आलेली आहेत. तेथे कर्मचाऱ्यांचीही भरती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे एक कोटी रुपयांचा वायफळ खर्च करण्यात आला. या इस्पितळात रुग्णच नाहीत; पण तिथे रुग्णसेवकांची मात्र भरती करण्यात आले आहेत,अशी माहितीही यावेळी देण्यात आली. येत्या विधानसभा अधिवेशनात या विषयावर आक्रमकपणे आपले विचार मांडणार असल्याची माहिती प्रा.पार्सेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

No comments: