Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 13 July, 2010

जिल्हा इस्पितळ सुरू न झाल्यास १५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन

उत्तर गोव्यातील भाजप आमदारांचा इशारा

म्हापसा, दि. १२ (प्रतिनिधी) - उत्तर गोव्यातील म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ अनेक वर्षे रखडले आहे. इस्पितळातील यंत्रणा वापराविना बंद असून या यंत्रणेची तीन वर्षाची "वॉरंटी' ही संपली आहे. सुमारे ४२ कोटी खर्चून बांधलेले म्हापशाचे हे इस्पितळ १५ ऑगस्टपूर्वी सुरू केले नाही, तर १६ ऑगस्टपासून त्याठिकाणी तळ ठोकून उपोषणाला बसण्याचा निर्धार उत्तर गोवा भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने आज म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
म्हापशाचे आमदार व भाजप विधिमंडळ पक्षाचे उपनेते ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, साळगावचे आमदार दिलीप परूळेकर, पेडणेचे आमदार दयानंद सोपटे, भाजप गटाध्यक्ष राजसिंग राणे, रूपेश कामत उपस्थित होते. उत्तर गोव्यातील म्हापसा पेडे येथे सुमारे ४२ कोटी खर्चून जिल्हा इस्पितळाचे काम पूर्ण होऊन २ वर्षे उलटून गेली आहेत, पण हे इस्पितळ सुरू अद्याप सुरू झालेले नाही. या इस्पितळात आरोग्यविषयक सेवा कशी व कधी मिळणार याची उत्सुकता उत्तर गोव्यातील नागरिकांना लागून राहिली आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्याचे आझिलो इस्पितळ अपुरे ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी बसवलेली सर्व यंत्रणा खराब होण्याच्या मार्गावर आहे आणि आणखी थोड्या दिवसांनी ती बाहेर फेकण्याची वेळ येणार आहे.आरोग्य मंत्री विश्वजित राणे आणि मुख्यंमत्री दिगंबर कामत कशासाठी दिरंगाई करीत आहेत, याची कल्पना येत नाही, असे आमदारांनी म्हटले.
जर आरोग्य मंत्र्याकडे इस्पितळाबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर पाण्याचे कनेक्शन नाही, विजेची समस्या आहे अशी उत्तरे देऊन दिशाभूल केली जात आहे. गोव्याचे सर्वच प्रकल्प पी.पी.पी. मॉडेलच्या आधारावर करून सरकारने फक्त पैसा कमावण्याचे धोरण आखले आहे, ही बाब गोेवेकरांच्या हिताची नाही, असे ऍड. डिसोझा म्हणाले.
पंधरा ऑगस्टपूर्वी म्हापसा पेडे येथील जिल्हा इस्पितळ सुरू झाले नाही, तर संप, मोर्चा, धरणे, उपोषण सुरू करून उत्तर गोव्यात आंदोलन सुरू करण्याचा इशारा ऍड. डिसोझा यांनी दिला आहे.
यावेळी लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, इस्पितळाच्या नव्या इमारती बांधण्यापेक्षा आहेत त्या इस्पितळात सेवेला उपयुक्त अशी साधने, सुविधा पुरवा. गोव्यातील मुख्य शहरातले बांबोळी वैद्यकीय इस्पितळ, मडगावचे हॉस्पिसियो आणि म्हापसा येथील आझिलो इस्पितळ ही मरण केंद्रे बनत चालली आहेत. अशा बाबींकडे लक्ष देण्याचे सोडून मंत्रिमहोदय विदेश वाऱ्या करताहेत, जनतेच्या पैशांची लूट करून रुग्णाला मरण यातना भोगायला लावत आहेत अशी टीका पार्सेकर यांनी केली.
आमदार सोपटे म्हणाले, ४२ कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या इस्पितळाच्या देखभालीचा खर्च सुमारे आठ लाख रुपये होत आहे. आता १५ ऑगस्टपासून आंदोलन हाच मार्ग शिल्लक राहिला आहे.

No comments: