Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 December, 2009

तेलंगणातील १३ मंत्र्यांचे राजीनामे

हिंसाचार जारीच, सोनिया गांधी यांना पाठविले फॅक्स
हैदराबाद, दि. २५ : आंध्रातील तेलंगणा विभागातील सर्वच्या सर्व म्हणजे १३ ही मंत्र्यांनी आज कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फॅक्सद्वारे एक सामूहिक पत्र पाठविले असून त्यात स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावर आपण आपापल्या पदाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे, असे कळविले आहे. या तेराही मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री रोसय्या यांची येथील सचिवालयात भेट घेऊन त्यांना आपल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. नंतर पी. लक्ष्मय्या, सविता रेड्डी, डी. श्रीधर बाबू व इतर मंत्र्यांनी सांगितले की, आम्ही केंेद्र सरकारला आवाहन केले आहे की, स्वतंत्र तेलंगणा निर्मितीसंदर्भात एक स्पष्ट कालमर्यादा आखून देण्यात यावी.
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी २३ डिसेंबर रोजी तेलंगणासंदर्भात जे नवे वक्तव्य केले आहे त्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून त्यामुळेच राज्यात पुन्हा आगडोंब उसळला आहे, याकडे या मंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. सोनिया गांधींची लवकरात लवकर भेट मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही या मंत्र्यांनी सांगितले.
हिंसाचार जारीच
आंध्रातील तेलंगणा भागात तेलंगणा समर्थकांचा हिंसाचार जारीच असल्याने स्थिती गंभीरच आहे. तेलंगणा समर्थक ठिकठिकाणी निषेध व्यक्त करीत आहेत, रास्ता रोको करत आहेत. विशेष म्हणजे ख्रिस्मसकडे बघता तेलंगणा राष्ट्रीय समितीने बंदचे आवाहन मागे घेतल्यानंतरही हा हिंसाचार जारी आहे. तेलंगणा संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरी पुरवठा विभागाच्या गोदामांवर हल्ला केला तसेच मेहबूबनगर येथे काही वाहनांना आग लावून दिली.
वारंगल शहरात समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाचे मंत्री पी. लक्ष्मय्या यांच्या घरावर दगडफेक केली. यानंतर लक्ष्मय्या यांनीही मंत्रिमंडळातील आपल्या १२ सहकाऱ्यांप्रमाणेच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्र्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला पोलिसांनी रोखले. वारंगलमधील काकातिया विद्यापीठासमोर हजारो तेलंगणासमर्थक विद्यार्थ्यांनी रॅली काढली व घोषणाबाजी केली.
आदिलाबाद जिल्ह्यातही तेलंगणासमर्थकांनी रॅली काढल्या, रास्ता रोको केले तसेच तेलंगणाविरोधक नेत्यांचे पुतळे जाळले. करीमनगर येथे आंदोलनकर्त्यांनी आठ ट्रकचे नुकसान केले तसेच गोदावरीखानी येथे एका कारला तसेच जीपला आग लावून दिली, असे पोलिसांनी सांगितले. काल उशिरा रात्री राघवपूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेची सिग्नल केबिन जाळून टाकली. तेलंगणा आंदोलनाला समर्थन म्हणून सिंगारानी कोळसाखाणीतील मजुरांनी आज सामूहिक रजा आंदोलन केले, तर मस्ताबाद पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पोथुगल खेड्यात असलेला इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला काही अनोळखी तत्त्वांनी क्षती पोेचवली. मेडक जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको, धरणे व पुतळे जाळण्यात आले. तामीळ अभिनेता मोहन बाबूचेही पुतळे आंदोलनकर्त्यांनी अनेक जागी जाळले. मोहनबाबू अखंड आंध्र मोहिमेत स्वत:ला सामावून घेतले आहे.

No comments: