Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 23 December, 2009

तिघा स्थानिकांविरुद्ध 'सनातन'ची तक्रार

बांदोडा आश्रमावर बाटल्या, दगडफेक
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमावर रात्रीच्यावेळी सोडा बाटल्या व दगडफेक तसेच आश्रमस्थानी येऊन अश्लील हावभाव आणि शिवीगाळ करणाऱ्या तिघा व्यक्तींविरुद्ध फोंडा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर संस्थेतर्फे रीतसर तक्रार सादर करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून हे प्रकार होत आहेत. तर, आठ दिवसांपासून यात वाढ झाली असल्याने ही तक्रार करण्यात आली असल्याचे आज संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी, सदाशिव धोंड व मराप्रसचे रमेश नाईक उपस्थित होते. यावेळी येथील काही स्थानिक लोक कशा पद्धतीने दगडफेक करतात आणि अश्लील हावभाव करून शिवीगाळ करतात याचे चित्रीकरण करून त्याची सीडी आज पत्रकारांना दाखवण्यात आली. जनजागृती मंच बांदोडाचे अध्यक्ष वसंत भट, संकेत नार्वेकर व जितेंद्र सावंत यांच्या विरुद्ध सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
येथील काही स्थानिक लोकांनी मडगाव येथे झालेल्या जिलेटिन स्फोटाचा ठपका संस्थेवर ठेवून संस्था बंद करण्याची मागणी केली आहे. तेव्हापासून संस्थेच्या इमारतीवर दगडफेक केली जात आहे. आश्रमात राहणाऱ्या साधकांना त्रास होईल अशी कृत्ये केली जात आहेत. चार वेळा सोडाच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या, महिला साधक राहत असलेल्या खोल्यांवर दगडफेक करण्यात आली. १९ डिसेंबर या दिवशी अनेकवेळा दगडफेक झाली. अशा पद्धतीने दहशत निर्माण केली जात आहे, असे श्री. मराठे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी रामनाथी येथे झालेल्या एका सभेत श्री रामनाथ देवस्थानचे पुजारी आणि जनजागृती मंचाचे अध्यक्ष वसंत भट आणि पंच गोविंद गावडे यांनी "कायदा हातात घेण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही, संताप आला तर सनातनचा आश्रम आम्ही जाळून टाकू' अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली होती, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. आश्रमावर होणाऱ्या हल्ल्यांची फोंडा पोलिसांना माहिती दिली होती परंतु, अपुरे मनुष्यबळ असल्याचे सांगून संरक्षण पुरवू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या तक्रारीचा विचार केला असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना श्री. मराठे म्हणाले की, सनातन संस्थेची शिकवण चुकीची असती तर, आश्रमावर दगडफेक करणाऱ्या लोकांना त्याच पद्धतीने विरोध झाला असता. संस्थेत थांबून चुकीची कृत्ये करणाऱ्या व्यक्तीला यापुढे आश्रमात धारा दिला जाणार नाही, आणि याची सूचना आमच्या सर्व प्रमुख साधकांना आणि आश्रम प्रमुखांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments: