Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 25 December, 2009

२६/११ च्या थराराचे पणजीत प्रदर्शन

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रसंगीचा थरार, त्यानंतरचे महत्त्वाचे क्षण आपला जीव धोक्यात घालून कॅमेराबंद केलेल्या छायापत्रकारांच्या धाडसी छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात भरवण्यात आले आहे. ठाणे जिल्हा प्रेस क्लबचा हा उपक्रम आहे. गोवा राज्य मराठी पत्रकार संघ, मिनेझिस ब्रागांझा संस्था व रवींद्र भवन, मडगाव यांनी संयुक्तरीत्या या छायाचित्रांचे पणजी व मडगाव येथे प्रदर्शन भरवले आहे.
आज पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात माहिती व प्रसिद्धी सचिव नरेंद्रकुमार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर, माहिती संचालक मिनिन पेरीस, सतीश सोनक, गोव्यातील वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष बेर्नाबे सापेको, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू नायक, संघाचे विभागीय सचिव प्रभाकर ढगे व ठाणे जिल्हा प्रेस क्बलचे अध्यक्ष दीपक जोशी हजर होते.२४ व २५ रोजी पणजी तर २७ व २८ रोजी रवींद्र भवन मडगाव येथे हे प्रदर्शन भरणार आहे.या छायाचित्रांच्या माध्यमाने मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा तो क्षण व पोलिस,अग्निशमन दल,राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे जवान व प्रत्यक्ष नागरिक यांची या हल्ल्यावेळी सुरू असलेली धडपड या छायाचित्रांमधून दिसून येते. हे क्षण टिपताना वृत्तपत्र छायाचित्रकारांनी घेतलेली जोखीम व त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला "कसाब' आपल्या जबानीत "तो मी नव्हेच' असे म्हणतो; पण हाच कसाब हातात बंदूक घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होता याचा पुरावा देणारे छायाचित्रही या प्रदर्शनात आहे.
छायाचित्रकार हे प्रत्यक्ष घटनेचे खरे साक्षीदार असतात, त्यामुळे समाजापर्यंत सत्य पोहचवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे,असे उद्गार शशिकलाताई यांनी काढले."पेज थ्री' च्या जमान्यात जीव धोक्यात घालून धाडसी छायाचित्रीकरण करणारेही लोक आहेत, हे यावरून दिसून येते, असेही त्या म्हणाल्या. माहिती व प्रसिद्धी सचिव नरेंद्र कुमार यांनी सांगितले की जीवन म्हणजे केवळ पुढे जात राहणे. अशावेळी आपण केवळ मागे वळून पाहू शकतो पण माघार घेऊ शकत नाही. जीवनात मागे वळून पाहताना छायाचित्रांचा मोठा वापर होतो.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेले हेमंत करकरे यांचे जॅकेट कचरा पेटीत सापडणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कालांतराने या धाडसी अधिकाऱ्यांचे बलिदानही आपण आठवणींच्या कचऱ्यात टाकणार की काय, असा सवाल करून या घटना ताज्या राहाव्यात यासाठी अशा प्रदर्शनांची गरज आहे, असे सतीश सोनक म्हणाले.
सुमारे साठ वृत्तपत्र छायाचित्रकारांचे ७५ फोटो त्यात प्रदर्शित करण्यात आले असल्याची माहिती दीपक जोशी यांनी दिली. मुळात हे फोटो सव्वादोनशे असून जागेअभावी त्यांचे प्रदर्शन करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. गोव्यानंतर हे प्रदर्शन अहमदाबाद, दिल्ली, राजस्थान अशा पद्धतीने संपूर्ण देशात भरवण्याचा संकल्प ठाणे जिल्हा प्रेस क्लबने सोडला आहे,असेही ते म्हणाले. यावेळी ऍड.अविनाश भोसले,बेर्नाबे सापेको, प्रसाद पानकर आदींची भाषणे झाली. अनिल पाटील यांनी आभार मानले.

No comments: