Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 September, 2009

आंध्रचे मुख्यमंत्री बेपत्ता

हेलिकॉप्टरचा शोध जारी

हैदराबाद, दि. २ - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.राजशेखर रेड्डी यांना घेऊन उड्डाण केलेले हेलिकॉप्टर आज (बुधवारी) सकाळी ९ . ३५ वाजल्यापासून बेपत्ता झाल्याने आंध्रप्रदेशाबरोबरच देशभरात एकच खळबळ उडाली आहे .
मुख्यमंत्री रेड्डी आपल्या कर्नूल जिल्ह्यात असलेल्या मतदारसंघात जाण्यासाठी बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता या हेलिकॉप्टरने निघाले होते. नियोजित वेळेनुसार हे हेलिकॉप्टर सकाळी १० . ४० वाजता कर्नूल इथल्या हेलिपॅडवर उतरणे अपेक्षित होते, मात्र रात्रीपर्यंत या हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकलेला नाही.
खराब हवामानामुळे या हेलिकॉप्टरचा साडेनऊ वाजता हवाई नियंत्रण कक्षाशी असलेला रेडिओ संपर्क तुटला. बाहेरचे वातावरण प्रचंड खराब असल्याने हेलिकॉप्टर जंगलातच उतरवत असल्याचा अखेरचा संदेश पायलटने दिला होता . मात्र त्यानंतर मध्यारात्रीपर्यंत या हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नसल्याने आंध्र प्रदेशातील उच्चस्तरीय अधिकारीवर्ग तसेच राजकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे
परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील उच्चपदस्थ अधिकारी तसेच जेष्ठ मंत्री सचिवालयात एकत्र झाले आहेत . राज्याचे पोलिस महासंचालक एसएसपी यादव , गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद राव आणि राज्याचे मुख्य सचिव रमाकांत रेड्डी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत . कर्नूल जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे .
सोनियांना चिंता
दिल्लीत गृहमंत्री पी . चिदंबरम स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संरक्षण मंत्रालय, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे कार्यालय या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याच्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शोध कार्यावर जातीने लक्ष ठेवण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली आणि पंतप्रधान कार्यालयातील मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हैदराबादला जाण्यास सांगितले आहे.
आतापर्यंत कोणतीही चांगली बातमी नाही. वाईट होऊ नये यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत,' असे केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम म्हणाले. प्रकाश उपलब्ध असलेल्या ठिकाणी शोधकार्य सुरू ठेवण्याचा आदेश राज्य सरकारला देण्यात आला असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

No comments: