Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 31 August, 2009

आज "वाहतूक बंद'

..नंबरप्लेटविरोधात सर्व वाहनचालक एकवटले
..भाजप, शिवसेना, युवक कॉंग्रेसचाही सहभाग
..पर्यायी व्यवस्थेबाबत सरकारची उदासीनता

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' सक्तीच्या विरोधात राज्यातील सर्व वाहतूकदारांनी सरकारने जारी केलेल्या "एस्मा' कायद्याचा मुलाहिजा न बाळगता उद्या ३१ रोजी जाहीर केलेला लाक्षणिक संप यशस्वी करून दाखवण्याचा वज्रनिर्धार केला आहे. या संपात बहुतेक सर्व सार्वजनिक वाहतूकदार सहभागी होणार असल्याने त्याचा मोठा परिणाम जनजीवनावर होणार आहे. या संपाला भाजप, भाकप, शिवसेना आदी राजकीय पक्षांनी आपला पूर्ण यापूर्वीच जाहीर केला असून खुद्द युवा कॉंग्रेसही संपात सहभागी होणार असल्याने या संपामुळे सरकारची पूर्णपणे नाचक्की होणार आहे.
सुरक्षेच्या कारणांवरून सरकारकडून हा निर्णय लादला जात असला तरी त्यामुळे दुचाकीपासून सर्व वाहनधारकांना आर्थिक भूदंर्ड सहन करावा लागणार आहे. देशात इतरत्र ही सक्ती कुठेही अद्याप लागू केली नसल्याने हा निर्णय स्थगित ठेवावा व इतर राज्यांत त्यांची कार्यवाही सुरू झाल्यानंतर हा निर्णय गोव्यात लागू करावा,अशी मागणी या वाहतूकदारांनी केली आहे. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर मात्र हा निर्णय स्थगित ठेवण्यास अजिबात राजी नाहीत. मुख्यमंत्री कामत यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी नेमलेली समिती ही केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार असून त्यांनी विधानसभेत या निर्णयाबाबत फेरविचार करण्याच्या आश्वासनालाही पाने पुसल्याने वाहतूकदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून रस्ता वाहतूक अधिकाऱ्यांमार्फत वाहतूकदारांची सतावणूक सुरू झाल्यानेही वातावरण बरेच गरम होत चालले आहे.हा संप मोडून टाकण्यासाठी ढवळीकर यांच्याकडून वाहतूकदारांच्या सतावणुकीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल,अशी माहिती वाहतूकदारांनी दिली आहे.दरम्यान, उद्याच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नेमकी काय उपाययोजना केली आहे किंवा प्रवाशांची सोय करण्यासाठी कोणती सुविधा उपलब्ध केली आहे याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती पुरवली नाही, यावरून सध्या सरकारी प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही निवडक नेत्यांना फौजदारी कायद्याच्या कलम १४९ अंतर्गत पोलिसांकरवी नोटिसा पाठवल्या आहेत व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास अटक करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सर्व वाहतूकदारांनी या संपाला पाठिंबा दर्शवून सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाला विरोध करावा,असे आवाहन या आंदोलनाचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी केले आहे.हा निर्णय लागू करण्याची घाई वाहतूकमंत्र्यांना नेमकी का झाली आहे याचे उत्तर ते देत नाहीत तसेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी विनंती करूनही ते आपल्या या निर्णयाशी ठाम असल्याने आता केवळ जनतेनेच त्यांना हा निर्णय बदलण्यास भाग पाडावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments: