Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 September, 2009

"आरटीओ'कारवाईच्या निषेधार्थ प्रवासी वाहतूक तीन तास रोखली

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) - हायसिक्युरिटी नंबर प्लेटला विरोध करण्यासाठी सोमवारी बसवाहतूक बंद ठेवण्यात आल्यानंतर आज वाहतूक अधिकाऱ्यांनी वाहतूकदारांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईने संतापलेल्या बसमालकांनी पुन्हा एकदा दुपारी बसवाहतूक ठप्प ठेवल्याने प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. गोव्याच्या काही भागांत दुपारी दोन ते तीन तास वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.नंबर प्लेटविरोधात भाजपने आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर सत्ताधारी पक्षाशी सलग्न युवक कॉंग्रेसनेही वाहनचालकांना पाठिंबा देत नंबरप्लेट मागे घेण्याची मागणी करून वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांना अधिक अडचणीत टाकले आहे. सत्तारूढ आघाडीतील अंतर्गत रस्सीखेचीमुळे प्रवाशांना मात्र गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.दरम्यान, याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आंदोलक वाहतूकदारांशी चर्चा करण्याचे आश्वासन देऊनही मुख्यमंत्री अथवा कोणीही अधिकारी संध्याकाळी सचिवालयात फिरकले नाहीत.
उत्तर गोवा प्रवासी बस मालक संघटनेने पुकारलेल्या कालच्या बंदात सहभागी झालेल्या वाहतूकदारांना आज वास्को, पणजी, म्हापसा तसेच फोंडा येथे वाहतूक निरीक्षकांनी "तालांव' देण्याचे सत्र आरंभल्याने संपूर्ण राज्यात वाहतूकदारांनी दुपारी अचानक अडीच तास बस वाहतूक ठप्प केल्याने लोकांची गैरसोय झाली. यावेळी सुरू ठेवण्यात आलेल्या कदंब बसगाड्याही अडवण्यात आल्या, तसेच अनेक बसगाड्यांमधून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पर्वरी येथे एका मिनिबसवर दगडफेक करून तिचे दोन्ही आरसे फोडण्यात आल्याची माहिती मिळाली . वाहतूकदारांनी अचानक वाहतूक ठप्प करून प्रवाशांना दावणीला बांधल्याने दुपारी घरी जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला. दुपारी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सुमारे १५० वाहतूकदारांचे "परमीट' नूतनीकरण करण्याचे आश्वासन देताच ३.३० वाजता बस वाहतूक सुरू करण्यात आली. या अचानक पुकारलेल्या बंदचा फायदा उठवत सरकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी दुपारीच घरची वाट धरली. तर, पणजी बाजारात आलेल्या लोकांनी आणि दुपारी शाळेतून सुटल्यावर घरी निघालेल्या विद्यार्थ्यांनी पायपीट करत बसस्थानक गाठले.
"हायसिक्युरिटी नंबर प्लेट' रद्द करण्याच्या मागणीवरून बस वाहतूकदारांनी छेडलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यास सरकारला अपयश आल्याने या आंदोलनाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारच्या या अपयशामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी आज संताप व्यक्त केला. या आंदोलनाला युवक कॉंग्रेसने पाठिंबा दिला असून या प्रश्नावर सायंकाळी चर्चा करण्यासाठी बोलावून मुख्यमंत्री मात्र रात्री उशिरा पर्यंत आले नव्हते. त्यामुळे येथेही वाहतूकदारांची फरफट झाली.
"एस्मा' कायदा लावलेला असतानाही संपात सहभागी झाल्याने आज सकाळी वास्को येथे ९ बसेच वाहतूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यात. तसेच अनेकांना भरमसाठ दंड देण्यात आला. त्याचप्रमाणे इशारा देऊनही संपलेल्या परमिटचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याने वाहतूकदारांनी आणि युवक कॉंग्रेसने वाहतूक ठप्प करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी प्रवासी बस मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनात कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर आणि गृहमंत्री रवी नाईक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर कॉंग्रेस भवनातून निघालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पणजी बसस्थानकावर जाऊन वाहतूक ठप्प केली. तसेच याची माहिती अन्य ठिकाणीही देण्यात आली. त्यामुळे एकाचवेळी राज्यातील सर्व बसस्थानकावर वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे वाहतूक सुरू होई पर्यंत सुमारे अडीच तास लोकांना ताटकळत बस स्थानकावर थांबावे लागले.
दरम्यान, या बंदला शह देण्यासाठी पणजीतून फोंड्याला जाणाऱ्या काही खाजगी बसेस मांडवी पुलाखालून सोडण्यात येत होत्या. तर, म्हापशाला जाणाऱ्या कदंब मांंडवी पुलावर रोखून धरण्यात आल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पणजी बस स्थानकावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
फोंडा-पणजी वाहतूक ठप्प
तिस्क उसगाव, (प्रतिनिधी) ः वाहतूक अधिकाऱ्यांच्या सतावणुकीला कंटाळून फोंडा ते पणजी वाहतूक करणाऱ्या सर्व खाजगी प्रवासी बसगाड्यांची वाहतूक आज दुपारपासून संध्याकाळपर्यत बंद ठेवण्यात आल्या. यामुळे पणजीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.
फोंडा ते पणजी, मडगाव फोंडा पणजी या मार्गावर वाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसगाड्यांना वाहतूक खात्याचे अधिकारी (आरटीओ) भरमसाठ दंड देत होते.त्यामुळे सर्व खाजगी प्रवासी बसगाड्यांचे मालक संतापले. त्यांनी दुपारी पणजीला जाणाऱ्या सर्व बसगाड्या रोखल्या.
सायंकाळी ५.३० वाजता फोंडा ते पणजी मार्गावरील खाजगी प्रवासी बसगाड्या सुरू करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी बस मालकांना आश्वासन दिल्याने आजचे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहीती या मार्गावरील बस मालकांनी दिली. आरटीओची सतावणूक खपवून घेतली जाणार नाही,अशा इशारा खाजगी प्रवासी बसवाल्यांनी दिला आहे.

No comments: