Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 September, 2009

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक १३ ऑक्टोबरला

हरयाणा व अरुणाचलमध्येही एकाच दिवशी मतदान

नवी दिल्ली, दि. ३१ - महाराष्ट्र, हरयाणा आणि अरूणाचल प्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केली. या तिन्ही राज्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे १३ ऑक्टोबरलाच मतदान होणार असून मतमोजणी २२ ऑक्टोबरला होणार आहे. या घोषणेसोबतच तिन्ही राज्यांमध्ये आचारसंहिताही लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीची अधिसूचना १८ सप्टेंबरला जारी होणार असून तेव्हापासून २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्जांची छाननी २६ सप्टेंबरला होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर राहणार आहे. १३ ऑक्टोबरला राज्यात एकाच दिवशी मतदान होणार असून मतमोजणी २२ ऑक्टोबर रोजी होऊन निकालही त्याच दिवशी घोषित होणार आहेत. २५ ऑक्टोबरपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
१ जानेवारी २००९ च्या मतगणनेनुसार राज्यातील ७ कोटी ५६ लाख ३४ हजार ५२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील एकूण २८८ मतदारसंघापैकी ५४ मतदारसंघ राखीव असून त्यात अनुसूचित जातींसाठी २९ आणि अनुसूचित जमातींसाठी २५ मतदारसंघ राखीव असणार आहेत. राज्यात आतापर्यंत ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांना आयोगातर्फे छायाचित्र असलेले निवडणूक ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती चावला यांनी दिली. मतदान हे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारेच होईल, हे त्यांनी स्पष्ट केले. मतदानासाठी राज्यभर ८२०२८ मतदानकेंद्रे राहणार आहेत.

No comments: