Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 September, 2009

एअर इंडियाच्या विमानाला लागलेली आग आटोक्यात

सर्व प्रवासी सुखरूप, इंजिनीअरला हटविले
मुंबई, दि. ४ - रियाधला चाललेल्या एअर इंडियाच्या विमानाला अचानक आग लागल्यामुळे मुंबई विमानतळावर काही वेळ खळबळ माजली होती. नंतर ही आग विझविण्यात यश आले. विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेला जबाबदार असलेल्या मेंटेनन्स इंजिनीअरला हटविण्यात आले आहे.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एआय ८२९ बोईंग ७४७ कोणार्क हे विमान रियाधकडे उड्डाण करण्यासाठी सज्ज होते. विमानाने टेक ऑफची तयारी करताच अचानक इंजिनला आग लागली आणि टेक ऑफ रद्द करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व प्रवाशांना आपत्कालीन शिड्यांनी खाली उतरविण्यात आले. विमानतळावरील अग्निशमन विभागाच्या लोकांनी आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आग कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विमान रनवेवर धावणे सुरू झाले असते किंवा विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर ही आग लागली असती तर मोठी दुर्दैवी घटना घडली असती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेसाठी जबाबदार असलेल्या मेंटेनन्स इंजिनीअरला (एएमई) कामावरून काढून टाकण्यात आले आहे. एएमईच्या परवानगीनंतरच वैमानिक उड्डाण करीत असतो, हे येथे उल्लेखनीय. या घटनेची आता सविस्तर चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
विमानातील प्रवाशांना सायंकाळी ५ वाजता अन्य विमानाने रियाधकडे रवाना करण्यात आले, असे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या प्रवक्त्याने पत्रकारांना सांगितले.

No comments: