Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 September, 2009

"वाहतूक बंद'ला दणकेबाज प्रतिसाद

नंबर प्लेटविरोधात तीव्र रोष

- "कदंब'च्या व्यवस्थेचा फज्जा
- युवक कॉंग्रेसतर्फेवाहतूक
मंत्र्यांना "घरचा आहेर'
- सरकारी कार्यालये ओस
- शाळांत हजेरी रोडावली
- बसस्थानकांवर शुकशुकाट

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट'च्या विरोधात आपला तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी खाजगी बस मालक संघटनेने पुकारलेल्या प्रवासी "वाहतूक बंद'ला राज्यात दणकेबाज प्रतिसाद मिळाला. या संघटनेने बंद ९९ टक्के यशस्वी झाल्याचे सांगितले; तर वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी हा बंद अपयशी ठरल्याचा दावा केला. डिचोली, पेडणे, फोंडा,चिंबल, काणकोण तसेच उसगाव याठिकाणी काही तुरळक ठिकाणी कदंब बसवर दगडफेक करण्याचे प्रकार घडले व काही ठिकाणी बसेस पंक्चर करण्यात आल्या. दरम्यान, वाहतूक मंत्री ढवळीकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी युवक कॉंग्रेसने केली आहे.
राज्यात बहुतांश खाजगी बसेस बंद असल्याने रस्त्यांवर केवळ कदंब बसेस धावत होत्या. अनेक बसस्थानकांवर बसेसच नसल्याने शुकशुकाट दिसत होता. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयांत व आस्थापनांत जाणाऱ्या मंडळींना ताटकळावे लागले. या वाहतूक बंदमुळे सरकारी कार्यालयांतील उपस्थिती रोडावली होती. तसेच शाळांतील उपस्थितीवरही त्याचा मोठाच परिणाम झाला.
पणजी येथे सकाळी वाहतूक खात्याच्या निरीक्षकांनी पोलिस संरक्षण पुरवून पणजी ते मिरामार अशी बस वाहतूक सुरू केली. विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांत पन्नास टक्केही विद्यार्थ्यांची उपस्थित पाहायला मिळली नाही. बसेसअभावी नागरिक आपली खाजगी वाहने घेऊन आल्याने सायंकाळी पणजीत आल्याने शहरात वाहतुकीची कोंडी झाली.
दरम्यान, वाहतूक मंत्र्यांचे धोरण जनहितविरोधी असल्याचा दावा करून युवक कॉंग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
ढवळीकर यांनी वाहतूक मंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी आज सायंकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत केला. यावेळी अखिल गोवा प्रवासी बंद वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक, सचिव मान्युएल रॉड्रिग्स, उत्तर गोवा बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर, युवक कॉंग्रेसचे जितेंद्र भंडारी, जितेश कामत आणि मंगेश वायकर उपस्थित होते.
श्री. आमोणकर म्हणाले की, "आमचे कॉंग्रेस सरकार जे काही करत आहे ते आम्हाला मान्य नाही. आजचा बंद हा कोणीही जबरदस्तीने केलेला नाही. वाहतूक मंत्र्यांनी महागड्या नंबर प्लेट ज्या सामान्य नागरिकांवर लादल्या आहेत, त्याविरोधात लोकांनी या आंदोलनाद्वारे उग्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याप्रश्नी वाहतूक मंत्री आपलीच मनमानी करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून वगळावे. अन्यथा या सरकारवरून लोकांचा विश्वास उडेल.
या बंदमुळे लोकांना त्रास झाला. तथापि, तो सर्वसामान्यांसाठीच होता. रिक्षा, पर्यटक टॅक्सी, टेंपो, ट्रक आदी २८ संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.
तीन महिन्यांसाठी तात्पुरता दिलेला बस परवाना संपल्याने त्या परवान्याचे नूतनीकरण करण्यास वाहतूक खात्याने विरोध दर्शवला आहे. सुमारे १२६ बस मालकांनी आज परवाना नूतनीकरणासाठी खात्यात अर्ज केला आहे. या बस मालकांना येत्या तीन दिवसांत परवान्याचे नूतनीकरण करावे, अशी सूचना श्री. आमोणकर यांनी केली.
फोंडा त पणजी मार्गावर सकाळी ज्या आठ बसेस सुरू होत्या त्या वाहतूक मंत्र्यांच्या एका नातेवाईकाच्या असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पणजी ते मिरामार मार्गावर धावणाऱ्या काही बसमालकांना त्यांच्या घरी जाऊन वाहतूक निरीक्षकांनी धमकावले आणि बसेस सुरू करण्यास भाग पाडले, अशी माहितीही श्री. आमोणकर यांनी दिली.
या संपात खाजगी वाहतुकीचा समावेश करण्यात आला नव्हता. येत्या काही दिवसांत श्री. ढवळीकर यांनी नंबर प्लेटची अंमलबजावणी मागे न घेतल्यास या पुढील आंदोलनात खाजगी वाहतूकदारांनाही सहभागी करून घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले.
बस मालकांचा यापूर्वी असा जोमदार बंद झाला नव्हता. त्यामुळे या बंदला पाठिंबा दिलेल्या सर्वांप्रती संघटनेचे अध्यक्ष नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

No comments: