Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 September, 2009

..तर नवव्या दिवशी गोवा "बंद'

संतप्त वाहतुकदारांचा सरकारला खणखणीत इशारा

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मागून घेतलेल्या मुदतीनुसार येत्या आठ दिवसांत "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट'चा प्रस्ताव रद्द न केल्यास नवव्या दिवशी पूर्ण गोवा "बंद' करण्याचा इशारा उत्तर गोवा प्रवासी बस मालक संघटनेने आज पणजी घेतलेल्या व्यापक बैठकीत दिला. या निर्णयाला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, युवक कॉंग्रेस आणि सर्व वाहतूक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. बैठकीला मोठ्या संख्येने वाहतुकदार तसेच वाहतूक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
व्यासपीठावर शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, उत्तर गोवा प्रवासी बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर, भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर, शिवसेनेचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, मुरगावचे नगराध्यक्ष सैफुल्ला खान, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर, मंगेश वायकर, मॅन्युएल फर्नांडिस, सुदीप ताम्हणकर, रजनीकांत नाईक, अनिल होबळे उपस्थित होते. यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. तसेच त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
केवळ एका मंत्र्याच्या लाखो रुपयांच्या कमिशनसाठी ही हाय सिक्युरिटी नंबरप्लेट नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कळंगुटकर यांनी केला. महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी त्वरित निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. गोव्याला हा प्रस्ताव नको असताना सरकार तो नागरिकांवर लादण्याचा का प्रयत्न करत आहे, असा खडा सवाल यावेळी आमदार माद्रेंकर यांनी केला.
वाहतूक मंत्री जर मुख्यमंत्र्याचे ऐकत नसतीलल तर त्यांना घरी पाठवा; त्यामुळे सरकार कोसळणार नाही, अशी मार्मिक टीकाही त्यांनी केली. तेव्हाच्या भाजप सरकारतही एक मंत्री ऐकत नव्हता. म्हणून त्याला काढून टाकण्यात आले. त्यानंतर भाजपचे सरकार कोसळले. मात्र, त्याचे आम्हाला दुःख नाही. उलट तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दाखवलेल्या हिंमतीचा अभिमान वाटतो, असे श्री. मांद्रेकर म्हणाले.
या सरकारचा कोणत्याही मंत्र्यावर वचक नाही. हा अन्यायकारक प्रस्ताव लादू पाहणाऱ्या मंत्र्याला त्वरित खुर्चीवरून खाली खेचण्याची गरज आहे. तसेच न झाल्यास प्रत्येकाला रस्त्यावर उतरण्यास भाग पडणार असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सुनील देसाई म्हणाले.
सध्याचे सरकार सर्वार्थाने कमकुवत आहे. म्हणून प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडे बोट दाखवून लोकांना नको असलेले प्रस्ताव लादण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या सरकारला विनवण्यात भरपूर वेळ गेला. आता ठोस कृतीची गरज आहे, असे उपेंद्र गावकर म्हणाले.
मासेमारी व बस वाहतूक हे दोनच व्यवसाय सध्या पूर्णपणे गोवेकरांच्या हाती आहेत. त्यांच्यावरसुद्धा हे सरकार अन्याय करीत आहे. आम्हाला आमच्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे यावेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले. राज्यात हाय सेक्युरिटी नंबरप्लेटच्या नावाने प्रचंड घोटाळा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
वाहन चोरीला गेल्यानंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून शोध घेण्यासाठी ज्या यंत्रणेची गरज आहे ती यंत्रणा या सरकारकडे नाही. तरीही सदर प्रस्ताव लादण्याचा प्रयत्न केला जातो. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री याचे गायब झालेले हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी चोवीस तास लागतात. अशा परिस्थितीत आमच्या दुचाक्यांचा शोध या नंबर प्लेटमुळे कसा लावला जाणार, असा प्रश्न यावेळी शिवसेनेचे शशिकांत सरदेसाई यांनी उपस्थित केला.
वाहने चोरीला जातात त्याचा तपास लावता येत नाही, म्हणून या नंबरप्लेट लादल्या जात आहेत. वाहतूक खात्याच्या एका अधिकाऱ्याने बनावट कागद पत्रावरुन ६० हजार वाहनांची बेकायदा नोंदणी केली आहे. त्याची आधी चौकशी करा, अशी मागणी यावेळी जय दामोदर संघटनेचे महेश नाईक यांनी केली. सुदिन ढवळीकर यांना उठता-बसता केवळ हाय सिक्युरिटी नंबरप्लेटच दिसू लागल्याची टीका मंगेश वायकर यांनी केली. अनिल होबळे, श्रीराम बोरकर, माधव बोरकर, प्रमोद कामत, सैफुल्ला खान, अरुण कालेकर यांनीही हाय सिक्युरिटी नंबरप्लेटच्या विरोधात जोरदार भाषणे केली.

No comments: