Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 September, 2009

नोकऱ्यांचे वाटप हा उघड भ्रष्टाचार - श्रीपाद नाईक

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारकडून सरकारी नोकऱ्यांची विक्री होते हे आता सिद्ध झाले आहे. कॉंग्रेसचे प्रभारी तथा राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी यापुढे सरकारी नोकऱ्यांचे सर्व सत्ताधारी आमदारांना समान वाटप होईल, असे वक्तव्य करून नोकर भरती प्रक्रियेची थट्टाच केली आहे. सरकारी नोकरभरती ही पात्रतेवर आधारीत असते व त्यासाठी लेखी परीक्षा व मुलाखती घेतल्या जातात. पण सरकारने केलेल्या वक्तव्यामुळे हा केवळ फार्स असल्याचे सिद्ध झाले आहे. आपल्या मर्जीप्रमाणे सरकारी नोकऱ्यांचे वाटप करण्याची जाहीर घोषणा करणे हे राज्यातील बेरोजगारांचे दुर्दैव असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केली.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर हजर होते. विद्यमान सरकारातील काही मंत्री नोकर भरतीत केवळ आपल्या मतदारसंघातील लोकांचा भरणा करीत आहेत, ही गोष्ट खुद्द सत्ताधारी आमदार मान्य करतात यावरून नोकरीसाठी अर्ज करून लेखी परीक्षा व मुलाखती देऊन नोकरीची अपेक्षा करणाऱ्या युवकांची फजितीच हे सरकार करीत असल्याचे उघड झाले आहे. आता तर चक्क सत्ताधारी आमदारांनी सरकारी नोकऱ्यांचे समान वाटप व्हावे, असा निर्णय कॉंग्रेस प्रभारी बी. के. हरिप्रसाद व राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतली. कॉंग्रेसला सरकारी नोकऱ्यांचा खुला बाजार करावयाचा आहे हे यावरून उघड झाले व ही राज्यातील बेरोजगारांसाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याचा आरोपही श्री.नाईक यांनी केला. राज्यात सरकारी नोकरी पात्रतेवर मिळत नाही तर मंत्री तथा आमदारांच्या इच्छेवर मिळते हेच यातून उघड झाले,असेही श्री.नाईक म्हणाले. शिक्षकांची फजिती नको
गोवा लोकसेवा आयोगातर्फे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील व भागशिक्षणाधिकारी पदांवर निवड करण्यासाठी निश्चित केलेल्या ५२ शिक्षकांची यादी गेले तीन महिने सरकारकडे पडून आहे. कायदेशीर लेखी परीक्षा व मुलाखती आयोजित करून पात्रतेच्या आधारावर आयोगाने निवड केलेल्या या यादीत एका मंत्र्याने शिफारस केलेल्या उमेदवाराचा समावेश नाही या कारणाने ही यादीच रोखून धरण्यात आली आहे, असा आरोप श्री. नाईक यांनी केला. शिक्षकांच्या निवडीबाबत सरकारकडून सुरू असलेले राजकारण ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. सरकारी नोकऱ्यांचे समान वाटप हे पक्षीय धोरण लागू करून ही यादीच रद्द करण्याचा डावही आखला जात आहे, अशी टीकाही श्रीपाद नाईक यांनी केली. या शिक्षकांची ताबडतोब निवड करून त्यांना न्याय द्या,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No comments: