Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 September, 2009

शाळेत चेंगराचेंगरी; पाच विद्यार्थिनी ठार

नवी दिल्ली, दि. १० - येथील एका उच्च माध्यमिक सरकारी शाळेत पावसाच्या पाण्याने विजेचा प्रवाह पसरल्याच्या अफवेने विद्यार्थी सैरभैर धावल्याने चेंगराचेंगरी होऊन त्यात पाच विद्यार्थिनी ठार झाल्याचे वृत्त आहे. अन्य आठ गंभीर असून, एकूण ३० विद्यार्थी रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. प्रचंड खळबळ माजविणाऱ्या या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिले आहेेेत.
ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास खजुरी खास परिसरात घडली. येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत पावसामुळे पाणी साचले होते. या पाण्यात विजेेेेेचा प्रवाह पसरल्याची अफवा उडाली. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या विद्यार्थिनींना खाली येण्यास सांगण्यात आले. जिना अतिशय अरुंद असल्याने तो घाईघाईने उतरण्याच्या प्रयत्नात अनेक विद्यार्थिनी कोसळल्या. तेथून खऱ्या अर्थाने या चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. काही कळण्याच्या आतच या घटनेने मोठ्या दुर्घटनेचे रूप घेतले आणि पाच विद्यार्थी दगावल्याचे लक्षात आले.
हा प्रकार जरा थांबल्यानंतर सर्व जखमींना तातडीने नजीकच्या गुरू तेगबहादूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेत जवळपास ३० विद्यार्थिनी जखमी झाल्या. आठ विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्यांना जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. अन्य जखमींची प्रकृती स्थिर आहे.
दिल्लीत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे शाळेत सर्वत्र पाणी भरले होते. या पाण्यात विजेचा करंट पसरल्याची अफवा पसरली. त्यावेळी शाळेत १३०० विद्यार्थी होते. काहींच्या परीक्षा सुरू होत्या.
चौकशीचे आदेश
या घटनेची माहिती मिळताच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी ताबडतोब गुरू तेगबहादूर रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत दिल्लीचे शिक्षणमंत्रीही होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी चौकशीचे आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात त्यांनी यासाठी चौकशी पथकाला पाचारण केले. त्याचप्रमाणे या घटनेत दगावलेेल्यांच्या नातेवाईकांना १ लाख रुपये, तर जखमींना १५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नागरिक संतप्त
या घटनेमुळे पालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी शाळेवर मोर्चा काढून दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतली नाही, असा आरोप संतप्त पालक करीत आहेत.

No comments: