Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 6 September, 2009

पावसाची वाटचाल शंभरीकडे
राज्यात पावसाची शतकाकडे घोडदौड सुरू असून आत्तापर्यंत एकूण ९७ इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती पणजी वेधशाळेच्या सूत्रांनी दिली. गेल्या चोवीस तासांत एकूण ३ इंच पाऊस पडला. आणखी किमान दोन दिवस असाच पाऊस सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हे त्यामागील मुख्य कारण आहे.

राज्यात तुफानी पावसाचे दोन बळी
जनजीवन विस्कळित
वाहतुकीचे तीनतेरा
अंजुणे धरणाचे
चारही दरवाजे खुले
फोंड्यात मंदिरामध्ये
पाणी घुसले
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर आजही कायम राहिल्याने राज्यभरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सांगे भागातील रिवण येथे इशांत सूरज रिवणकर हा साडेतीन वर्षांच्या मुलगा काल ओहळाच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊन मरण पावला; तसेच फोंडा तालुक्यातील बांदिवडे येथे एकजण वाहून गेला. त्याचा शोध सुरू असून त्याचे नाव समजलेले नाही. अंजुणे धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे डिचोली व साखळी भागावर पुराचे संकट ओढवण्याची शक्यता वाढली आहे. बाकीच्या ठिकाणी जीवितहानीची नोंद नसली तरी विविध ठिकाणी झाडांची पडझड होऊन वाहतुकीचा खोळंबा उडण्याबरोबरच अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळण्याचेही प्रकार घडले.
अंजूणे धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचा चौथा दरवाजाही आज उघडण्यात आला. डिचोली व साखळी भागावर पुराचे संकट ओढवण्याची शक्यता वाढल्याने आपत्कालीन यंत्रणा याठिकाणी पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे.आज दिवसभरात पडलेल्या पावसामुळे पणजी शहर पूर्णपणे पाण्याने भरले होते.जिथेतिथे रस्त्यावर पाणी भरल्याने पादचारी व वाहन चालकांना बरीच कसरत करावी लागली.चिंचोळे येथे एका घरावर माड पडल्याने सुमारे पाच हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.आजदिवस भरात अग्निशमन दलाशी अनेकांनी संपर्क साधल्याने दिवसभरात खात्याचे जवान मदतकार्यात व्यस्त होते.
सांग्यात लहानग्याचा बुडून मृत्यू
सांगे प्रतिनिधी ः रिवण सांगे येथे श्री विमलेश्वर मंदिरासमोर राहणाऱ्या सूरज रिवणकर यांच्या घरासमोरून एक ओहोळ वाहतो. संततधार पावसामुळे सध्या ओहोळाची पातळी बरीच वाढलेली आहे. शुक्रवार ४ रोजी मुसळधार पाऊस पडत असल्याने सूरज यांनी आपल्या दोन्ही मुलांना इशांत (४) व शुभम (५) यांना बालवाडीमध्ये न पाठविण्यास आपल्या पत्नीला सांगितले व ते कामावर निघून गेले. दुपारी बाराच्या सुमारास या दोघांनीही आपणास शौचाला जायचे आहे, असे आईला सांगितले. त्यानंतर ते घराबाहेर पडले. काही वेळाने शुभम घरी आला व इशांत दिसत नसल्याने आईने बाहेर जाऊन त्याची शोधा-शोध सुरू केली. शेजाऱ्यांकडे विचारपूस करूनही तो सापडला नाही. त्यामुळे वडिलांना पाचारण करण्यात आले. वडिलांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ओहोळात शोधाशोध सुरू केली व अखेर दीड कि.मी. अंतरावर कुशावती नदीच्या संगमावर भोवऱ्यात अडकलेल्या इशांतचा पार्थिव मिळाले.
रिवण पोलिसांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. नंतर दुपारी शोकाकूल वातावरणात रिवण येथे इशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना हुंदका आवरला नाही. आपल्या कोवळ्या मुलांच्या निधाने रिवणकर कुटुंबावर शोककळा पसरली त्या भागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

No comments: