Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 7 September, 2009

वादग्रस्त"रिवा रिसॉर्ट'चे कुंपण उद्या पाडणार

मांद्रेच्या खास ग्रामसभेत
पंचायत बरखास्तीची
ग्रामस्थांची मागणी

पेडणे, दि. ६ (प्रतिनिधी) - मांद्रे पंचायतीच्या खास ग्रामसभेत आज ग्रामस्थांनी पंचायत मंडळ बेकायदा बांधकामांची पाठराखण करीत असल्याचा आरोप करून पंचायत मंडळाला चांगलेच फैलावर घेतले. जुनसवाडा येथील तथाकथित "रिवा रिसॉर्ट'च्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात पंचायतीला अपयश आल्याने पंचायत मंडळ तात्काळ बरखास्त करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यासमोर नमते घेत "रिवा रिसॉर्ट'चे बेकायदा कुंपण मंगळवार ८ रोजी मोडून टाकण्यात येईल ,असे स्पष्टीकरण देत सरपंच महेश कोनाडकर यांनी ग्रामस्थांना शांत केले. हे आश्वासन पूर्ण न झाल्यास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू असा इशारा देत ग्रामस्थांनी पंचायत मंडळाची झोपच उडवली.
मांद्रे जुनासवाडा येथील "सीआरझेड' चे उघडपणे उल्लंघन करून थेट किनाऱ्यावरच उभारलेल्या रिवा रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामावर चर्चा करण्यासाठी ही खास ग्रामसभा बोलावण्यात आली होती. "सीआरझेड' संबंधी उच्च न्यायालयाने पंचायतींना कारवाई करण्याचे आदेश दिले असताना बड्या बांधकामांना मात्र पंचायतीकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जुनसवाडा येथील रिवा रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीररीत्या सुरू असताना पंचायतीकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, यावरून या प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करून ग्रामस्थांनी पंचायत मंडळच बरखास्त करण्याची मागणी केली. या बांधकामावर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दर्शवल्याने पंचायत मंडळाचे धाबेच दणाणले. सरपंच महेेश कोनाडकर यांनी यावेळी ग्रामस्थांना १६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत आश्वासन दिल्याप्रमाणे १८ रोजी सदर बांधकामाचा पंचनामा केला व लगेच पुढची नोटीस जारी करून सदर बांधकामाचे मालक भरत नाईक यांना बेकायदेशीर बांधकामाबाबत स्पष्टीकरण देण्यास चौदा दिवसांची मुदत दिल्याचे सांगितले. भरत नाईक यांनी सदर नोटिशीस अतिरिक्त पंचायत संचालकांकडे "आव्हान' दिले असून ती सुनावणी येत्या १० रोजी होणार आहे, त्यामुळे पंचायत काहीही करू शकत नाही असा पवित्रा घेतला. मुळातच या बांधकामाबाबत पंचायतीकडून कारवाई करण्यास विलंब का झाला,असा आरोप करून यावेळी ग्रामस्थांनी सरपंचांना चांगलेच धारेवर धरले.
आजच्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी पंचायत कायद्याचा योग्य अभ्यास पंचायत मंडळाला चांगलेच कैचीत पकडले. ही ग्रामसभा "पाच मिनिटांत' गुंडाळण्याचा डाव आखलेल्या पंचायत मंडळाला ग्रामस्थांनी सुमारे साडेतीन तास वेठीस धरून आज ग्रामसभेतील ग्रामस्थांनी खरी भूमिका काय असते हे पटवून दिले. पंचायतीच्या आदेशाला आव्हान दिले म्हणून पंचायतीला कारवाई करण्यापासून कुणी रोखले असा सवाल करून केशव मांद्रेकर यांनी पंचायत मंडळ याप्रकरणी लोकांचा डोळ्यांत धूळ फेकत असल्याचे सांगितले. या बांधकामप्रकरणी घोटाळा झाला असून पंचायतीच्या सर्व सदस्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देऊन घरी जावे,अशी मागणी त्यांनी केली व या मागणीचे उपस्थित सर्व नागरिकांनी जोरदार समर्थन केले. विद्यमान पंचायत मंडळ सुशिक्षित आहे त्यामुळे ते गावचे हित जपेल अशी लोकांची समजूत होती पण या पंचायत मंडळाने मात्र लोकांची घोर निराशा केल्याची टीका जयवंत हणजूणकर यांनी केली. पंचायत सचिव श्री.नाईक यांच्याकडून पंचायत मंडळाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.शेवटी शिवकुमार आरोलकर यांनी पंचायत कायदा कलम २००(१)अंतर्गत पंचायत मंडळ आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका ठेवून हे पंचायत मंडळ बरखास्त करावे,असा ठराव सादर केले व पंचायत मंडळ सदस्यांचे धाबेच दणाणले. शेवटी येत्या ८ रोजी या बांधकामावर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर अखेर हा ठराव मागे घेण्यात आला. हे आश्वासन पूर्ण झाले नाही तर पंचायतीला उच्च न्यायालयात खेचून अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. या सभेत सुभाष आसोलकर,महेश मांद्रेकर,शिवकुमार आरोलकर,सुरेश सावंत,ऍड.प्रसाद शहापूरकर, शंकर गोवेकर, निलेश मांद्रेकर आदी युवकांनी भाग घेतला व पंचायत कायद्याचा आधार घेऊन पंचायत मंडळाला फैलावर घेतले.

No comments: