Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 23 July, 2009

लोकायुक्त तातडीने नियुक्त करा

पर्रीकर यांची विधानसभेत मागणी

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)- राज्य सरकारचा प्रशासनावरील ताबा पूर्णपणे सुटला असून सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे.सरकारी अधिकाऱ्यांकडून झालेल्या चुकांवर सरकारकडून पांघरूण घातले जात असल्याने हा कारभार नियंत्रणात येणे शक्यच नाही. भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकायुक्तांची लवकरात लवकर नियुक्ती व्हावी,अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज विधानसभेत विविध खात्यांसाठी सादर केलेल्या पुरवण्या मागण्यांना कपात सूचना मांडून त्यावर भाष्य करताना पर्रीकर यांनी प्रशासकीय भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला. मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख आहेत व उर्वरित मंत्री हे सरकार चालवण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी आहेत. राज्य प्रशासन, वित्त व दक्षता ही तीन महत्त्वाची खाती असून त्यावर मुख्यमंत्र्यांचे पूर्ण लक्ष हवे. सरकारच्या खर्चाला काहीही पारावार राहिला नसून तो खर्च कमी केल्यास त्याचा उपयोग अनेक चांगल्या योजनांसाठी वापरता येईल. विविध मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यांवर केलेल्या खर्चाच्या भानगडीही यावेळी पर्रीकर यांनी सादर केल्या. या भानगडींना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, तेव्हाच या गोष्टी आटोक्यात येतील,असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.सरकार पक्षातील काही आमदार मंत्रिपद न मिळाल्याने असंतुष्ट आहेत, त्याचा राग काढण्यासाठी त्यांच्याकडून अगदी असभ्य भाषेतून सरकारवर टीका सुरू आहे. ही टीका सरकारासह राज्यालाही बदनाम करीत असल्याची तक्रार पर्रीकर यांनी केली. सत्ताधारी पक्षातील एखाद्या आमदाराला सरकारबाबत तक्रार असेल तर त्यांनी आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावे,अशी सूचनाही पर्रीकर यांनी यावेळी केली.रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींची थट्टा यापुढे तरी बंद करून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेले आश्वासन पूर्ण करावे व त्यांना सेवेत नियमित करून घ्यावे,असेही पर्रीकर म्हणाले.अनुकंपा धोरणानुसार नोकरीसाठी अनेकांचे अर्ज पडून आहेत, त्यांना तात्काळ न्याय देण्याची गरज आहे. काही लोकांकडून विनाकारण इंग्रजीचे स्तोम माजवले जात आहे. हे स्तोम कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकणी व मराठी अकादमींनी अधिक सक्रिय बनण्याची आवश्यकता आहे,असेही पर्रीकर म्हणाले.सार्वजनिक गाऱ्हाणी खाते पूर्णपणे निष्क्रिय बनले असून त्याला चालना मिळवून देण्याची गरज आहे.फिल्म निर्मितीसाठीची मदत पन्नास लाखांपर्यंत मिळावी,असे सांगून मनोरंजन संस्थेवर अनेक गैरप्रकार सुरू असून तिथे मुख्यमंत्र्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे,असा सल्लाही पर्रीकर यांनी दिला.फातोर्डा येथे काही बिगरगोमंतकीय लोकांचा समावेश मतदार याद्यांत करण्यात आला आहे त्याची चौकशी व्हावी तसेच नुवे येथे बेकायदा गृह प्रकल्पाचे काम सुरू असून दक्षता खात्याने प्रथम दर्शनी या बांधकामाला आक्षेप घेऊनही ते सुरू असल्याचे पर्रीकर म्हणाले.दक्षता खाते पूर्णपणे निष्क्रिय बनल्याने लोकायुक्त कायदा लवकरात लवकर आणावा,अशी मागणीही त्यांनी केली.

No comments: