Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 July, 2009

अखेर कसाबची कबुली!

..लाखवी हाच मास्टर माईंड
..करकरेंना मारल्याचेही स्वीकारले


मुंबई, दि. २०- होय, २६ नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला केल्याचा आरोप मला मान्य आहे...असे स्वत:हून कबूल करीत, मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने संपूर्ण कटाचीच माहिती आज न्यायालयाला देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. न्यायालयाने कसाबचा कबुलीजबाब नोंदवून घेतला आहे.
या हल्ल्याचा कट पाकिस्तानातच कसा रचण्यात आला, त्याचे सूत्रधार कोण होते याबाबत सविस्तर माहितीही कसाबने दिल्याने भारताकडे आता भक्कम पुरावा आला आहे. त्याचप्रमाणे कसाबच्या या कबुलीने पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच गोची होणार हे स्पष्टच झाले आहे.
विशेष न्यायाधीश एम. एल. ताहिलीयानी यांच्या न्यायालयात आज कसाबने अतिशय नाट्यमयरित्या ही कबुली दिली. या खटल्याचे कामकाज सुरू झाले, तेव्हापासून मी निर्दोष आहे, माझे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे, मी पाकिस्तानी नाही अशी अनेक कारणे देत कसाबने आपल्या बचावाचा निष्फळ प्रयत्न चालविला होता. पण, अखेर आज त्याला आपल्या गुन्ह्याची कबुली द्यावी लागली.
आज सकाळी जेव्हा खटल्याचे कामकाज सुरू झाले तेव्हा त्याने "मुझे गुनाह कबूल करना है', असे सांगत उपस्थितांना धक्का दिला. पण, अशा पद्धतीने खटला सुरू असताना मध्येच कबुली घ्यायची का, असा मुद्दा सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला. त्यानंतर कोर्टाने कायदेेशीर बाबी तपासत हा कबुलीजबाब नोंदविण्यास संमती दिली.
कसाबने आपल्या जबानीत या हल्ल्याचे कारस्थान पाकमध्येच रचण्यात आल्याचे सांगितले असून याचा "मास्टर माईंड' लाखवी असल्याचीही कबुली दिली आहे. यामुळे आता पाकला तेथील अतिरेक्यांवर कारवाई करणे भाग पडणार आहे.
सध्या कसाब ऑर्थर रोड कारागृहात असून या खटल्याची सुनावणी १७ एप्रिलपासून सुरू झाली आहे.
असा होता घटनाक्रम...
कसाबने कोर्टात हल्ल्याचा सांगितलेला घटनाक्रम पुढीलप्रमाणे : आम्ही कराचीहून निघालो. सारे मिळून एकूण दहा जण होतो. चौघे परत गेले आणि आम्ही अल हुसेनी बोटीने भारताच्या हद्दीत शिरलो. एका रात्री आम्ही नमाज पढून झोपलो. अल हुसेनीवर मुर्शद, हकीम, उस्मान असे लोक होते. त्यांनी बोट सुरू केली. त्यानंतर आम्हाला अनेक बोटी दिसल्या. त्यातील एक बोट कुबेर होती. त्यावर उतरायचे ठरले. आमच्या खलाशाने तिला टक्कर दिल्यानंतर आम्ही ती बोट ताब्यात घेतली.
आम्ही तीन दिवस पुरेल एवढे पेट्रोल आणि सामान घेतले. तिथे आम्हाला अमरसिंग सोलंकीची मदत घेण्यास सांगण्यात आले. तेव्हा एक फोन आणि जीपीएस मुर्शदने इस्माईलकडे दिला. तो वापरून आम्ही समुद्रात फेकून दिला. तीन दिवस आणि चार रात्रींचा प्रवास करून आम्ही २६ नोव्हेंबरला दुपारी साडे तीन वाजता मुंबईत पोहोचलो. तेथे अबूने कोेणाला तरी फोन करून "क्या हाल है', असे विचारले. "चार बकरे थे वो तुमने खा लिये क्या', असा सवालही त्यावेळी झाला. मग सोेलंकीला मारून टाकायचे ठरले. त्याला केबिनमध्ये नेण्यात आले. पण, कोणी मारले हे माहिती नाही. पण, मी उमेदकडे दोरी आणि शोएबकडे रक्त लागलेला चाकू पाहिला.
दरम्यान, अंधार झाला. लहान बोटीतून आम्ही मुंबईच्या किनाऱ्यावर उतरलो. आमच्या प्रत्येकाच्या बॅगेत एक एके-४७, एक पिस्तूल, आठ बॉम्ब, एक खंजीर, सहा मॅगझिन, ड्रायफट आणि पाण्याची बाटली होती. त्यानंतर आम्ही गट पाडले आणि निघालो. मी आणि अबू इस्माईल सीएसटीकडे निघालो. तिथे गेल्यावर मी टॉयलेटमध्ये जाऊन बॉम्बवर कसाब असे नाव लिहिले.
मग आम्ही ग्रेनेड फेकले आणि फायरिंग सुरू केली. इस्माईलच्या गनचे मॅगझिन संपले आणि त्याने ते लोड केले. तो फोटो सगळ्यांनीच पाहिला आहे. त्यानंतर कामा हॉस्पिटलच्या गल्लीत आमच्या डोळ्यावर लाईट पडला. आम्ही जाळीमागे लपलो असता एका पोेलिस गाडीतून फायरिंग झाले.
माझ्या खांद्याला गोळी लागली. त्यामुळे माझी एके खाली पडली. पण, इस्माईलने शॉट फायर केले आणि त्यात करकरे, साळस्कर आणि कामटे मारले गेले असावेत. मग आम्ही तीच गाडी घेऊन निघालो. मेट्रोजवळही अबूने गोळीबार केला. मग एका स्कोडा चालकाला धमकावून ती ताब्यात घेतली. हे दृश्य मोटारसायकलवर असलेल्या एका पोलिसाने पाहिले.

No comments: