Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 July, 2009

जुवारी पुलासाठी लगेच पुढाकार घ्या

पर्रीकर यांची सरकारला सूचना

पणजी, दि.२३ (प्रतिनिधी)- सध्याचा जुवारी पुल कमकुवत बनला आहे, त्यामुळे समांतर जुवारी पुलाचे काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे. राज्य सरकारकडून याप्रकरणी केंद्राकडे बोट दाखवले जाते. केंद्राला यात काहीही रस नाही. गोमंतकीयांच्या सुरक्षेखातर राज्य सरकारलाच याप्रकरणी पुढाकार घ्यावा लागेल, अशी सूचना विरोधी पक्षनेतेमनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत केले. पत्रादेवी ते पोळे या नियोजित चौपदरी व सहापदरी महामार्गावर केवळ गोव्याबाहेरील वाहनांसाठी टोल आकारला जावा, अशी मागणी श्री. पर्रीकर यांनी केली. यापूर्वी मांडवी व जुवारी पुलाच्या टोलावरून निर्माण होणारा घोळ अजूनही लोक विसरलेले नाहीत.नव्या महामार्गालाही टोल आकारला गेल्यास स्थानिकांकडून त्याला विरोध होण्याचीच जादा शक्यता आहे,असेही पर्रीकर म्हणाले.
आज विधानसभेत सार्वजनिक बांधकाम खाते,वन, जलसंसाधन व पणजी वेधशाळा यांच्या पुरवणी मागण्यांना कपात सूचनांवर ते बोलत होते. भविष्यात पाण्याची समस्या हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरणार आहे. सा.बां.खाते व जलसंसाधन खाते यांनी एकमेकांच्या समन्वयाने पाण्याच्या संवर्धनासाठी नियोजन करण्याची गरज आहे,असेही पर्रीकर यांनी सांगितले.तिळारीचे पाणी येत असले तरी ओलिताखालील जमीन कमी होत चालली आहे. म्हापसा गिरी येथील शेतात तिळारीचा कालवा पोहचला पण तिथे शेती कोण करीतच नाही. याठिकाणी पाणी प्रक्रिया उभारल्यास त्याचा उपयोग पर्वरी व बार्देश तालुक्यातील किनारी भागांना होणे शक्य आहे,असा सल्लाही पर्रीकर यांनी दिला.अमर्याद बोअर विहिरींमुळे पाण्याचे साठे संपुष्टात येत असल्याचा धोकाही पर्रीकर यांनी यावेळी नजरेस आणून दिला.तिळारीचे प्रक्रिया न केलेले पाणी उद्योग व इतर कामांसाठी केल्यास शुद्ध पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करता येईल.
वनक्षेत्राचे रक्षण करणे ही वनखात्याची जबाबदारी आहे. सध्या वन व अभयारण्य क्षेत्रात मोठ्याप्रमाणात खाण उद्योग येत आहेत. खनिजाची चाळण करण्यासाठी कुशावती नदीचा वापर केला जातो व त्यामुळे साळवळी धरण धोक्यात आले आहे.कदंब पठारावर रहिवासी वसाहत वाढल्याने तेथील लोकांना पाण्याची सोय करण्यासाठी तिथे एक टाकी बांधावी,असेही पर्रीकर यावेळी म्हणाले.

No comments: