Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 July, 2009

क्रीडानगरीविरोधात पेडण्यात भव्य मोर्चा

महिलांचा लक्षणीय सहभाग, बाबूंच्या राजीनाम्याची मागणी
पेडणे दि.२३ (प्रतिनिधी) - धारगळ येथे नियोजित क्रीडा नगरीच्या विरोधात पेडणे तालुका मंच व क्रीडानगरी जमीन बळकावविरोधी कृती समिती धारगळ आणि विर्नोडातर्फे पेडणे बाजार परिसरात मूक मोर्चा आज २३ रोजी दुपारी ४ वाजता काढण्यात आला. यावेळी पेडणे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांना मोर्चातर्फे निवेदन सादर करण्यात आले.
शेतकरी प्रशांत परब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी चुकीची माहिती दिल्याप्रकरणी त्यांनी विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जी १३ लाख २६ हजार ८७५ चौरस मीटर जागा आहे त्यात पाच हजारांपेक्षा जास्त झाडे आहेत. त्याचा पुरावा पाहिजे असेल तर त्यांनी पुन्हा बागायतीत येऊन पाहणी करावी.
१८४ शेतकऱ्यांची हरकत
क्रीडा नगरीकरता भूसंपादन प्रक्रिया करण्यासाठी आदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या सूचना व हरकती देण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीत १८४ शेतकऱ्यांच्या लेखी हरकती नोंदवल्या. पेडणे तालुका नागरिक मंचचे सरचिटणीस सदानंद वायंगणकर व नीलेश पेटकर यांनी सांगितले, सुरुवातीला मंत्री आजगावकर केवळ ४ शेतकऱ्यांचा क्रीडानगरीला विरोध आहे असे म्हणत होते. असे असताना १८४ शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे.त्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या मोर्चात भाग घेतला ही समाधानाची बाब आहे. ही केवळ सुरुवात असून सारे शेतकरी एकजूट आहेत. चतुर्थीनंतर या आंदोलनाला आणखी तीव्र स्वरूप प्राप्त होणार आहे.
गावागावांत जागृती
उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांनी निवेदन सादर केल्यानंतर स्थानिक पत्रकारांना सदानंद वायंगणकर यांनी सांगितले, या मोर्चाद्वारे आम्ही सरकार व मुख्यमंत्र्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची जी उपेक्षा सुरू आहे त्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे गावागावात दहन केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आपल्या हाती "एक दो एक दो बाबूको फेक दो' "शेती बागायती वाचवा', "पेडणे तालुका वाचवा' असे फलक घेऊन महिलाही मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. उपजिल्हाधिकारी मिरजकर म्हणाले, आपणास सादर केलेले निवेदन सोमवारपर्यंत आपण उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचवणार आहोत. ज्या १८४ शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या त्या प्रत्येकाची सुनावणी घेतली जाणार आहे. नियोजित क्रीडा नगरीच्या जागेत कीती झाडे जातात त्याचा अहवाल वनखाते व कृषी खाते यांनी अजून पाठवलेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर त्याविषयी आपण माहिती देऊ.
शेतकऱ्यांनी श्रमपूर्वक सांभाळलेली बागायती व शेतजमिनीवर सहजासहजी नांगर फिरवू देणार नाही. संभाव्य क्रीडा नगरीतून बागायती व शेतजमिन वगळली जावी. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे शेतकरी प्रशांत परब यांनी सांगितले.

No comments: