Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 July, 2009

अडवाणींची लवकरच रथयात्रा

भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण करणार
नवी दिल्ली, दि. १९ - लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे वरिष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचा धीर अजिबात खचला नसून देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या मंदावलेल्या उत्साहाला नवा तजेला देत, त्यांना पुढील लढ्यासाठी तयार करण्याच्या उद्देशाने अडवाणी आणखी एका "यात्रे'ची तयारी करीत आहेत.
"मी मागच्या वेळी रथयात्रेदरम्यान घेतल्या तशा यावेळी सार्वजनिक सभा घेणार नाही. देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना भेटून निवडणुकीतील पराभव जिव्हारी लावून घेण्याचे काही एक कारण नाही.' ही सामान्य बाब असल्याचे त्यांना पटवून सांगण्याची आपली योजना असल्याची माहिती अडवाणी यांनी दिली.
"यात्रे'दरम्यान अडवाणी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतील. त्याचप्रमाणे पक्षाच्या वाईट कामगिरीवरही विचार करतील. पक्षकार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊनच अडवाणी यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारले हे येथे उल्लेखनीय!
अडवाणी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागणार असे दिसत आहे. अगदी पूर्वीप्रमाणेच निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची दिनचर्या फारच व्यस्त राहिली आहे. २१ ऑगस्ट रोजी समाप्त होणाऱ्या "चिंतन बैठकी'नंतर अडवाणी यांची "यात्रा' सुरू होणार आहे. यापूर्वीच्या रथयात्रांनी भाजपाला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून दिला होता. १९९० मधील सोमनाथ ते अयोध्येपर्यंतच्या राम रथयात्रेने देशभरात राम मंदिर मुद्यावरून जनआंदोलन उभे झाले होते. या आंदोलनाने भाजपाचे राजकीय भवितव्य घडविले. त्यानंतर देशभरात भाजपाची लाट निर्माण झाली होती. परिणामी १९९६ मध्ये भाजपाने केंद्रात सत्ता स्थापित केली होती. अडवाणी यांनी १९९३ मध्येही जनादेश यात्रा काढली होती.
२००६ मध्ये त्यांनी भारत सुरक्षा यात्रा काढली होती. यादरम्यान त्यांनी संपुआ सरकार त्यांच्या मुस्लिम तुष्टीकरण धोरणामुळे दहशतवादाविरुद्ध गंभीर नसल्याचे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. या सर्व यात्रांच्या अगदी विरुद्ध यावेळी अडवाणी पक्ष कार्यकर्त्यांकडे लक्ष देणार आहेत. सलग दोन लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळले असून त्यांच्यात नवा जोम भरण्याचे काम ते करणार आहेत. "विद्यार्थी, युवक अशा पक्षाच्या सर्वच शाखांमधील कार्यकर्त्यांची मी भेट घेईन. कॉंग्रेसच्या अधिपत्याला मोडित काढून देशाचे राजकारण द्वि-दलीय बनविण्यात भाजपाने यश मिळविले असून हीच आमची सर्वात मोठी प्राप्त असल्याचे मला कार्यकर्त्यांना पटवून द्यायचे आहे,' असेही अडवाणी यांनी सांगितले.

No comments: