Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 July, 2009

सूर्यग्रहणामुळे अनेक रहस्ये उलगडणार

वाराणसी, दि. २० - येत्या २२ जुलैच्या खग्रास सूर्यग्रहणामुळे सृष्टीच्या अनेक रहस्यांचा उलगडा होईल, असा विश्वास जगभरातील खगोल वैज्ञानिकांना वाटत आहे. कारण गेल्या दोन दशकांत खग्रास सूर्यग्रहणादरम्यानच जगाला चकित करणाऱ्या आइनस्टाईनच्या सापेक्षता वादाच्या सिद्धांताचा यशस्वीपणे उलगडा झाला असून सृष्टीतील हेलियम या वायुचाही शोध लागला आहे.
खग्रास सूर्यग्रहणाचे जसे धार्मिक महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्त्वही आहे. १८ ऑगस्ट १९६८ रोजी भारतातील खग्रास सूर्यग्रहणादरम्यानच गुंटूर येथे हेलियम वायुचा शोध लागल्याची माहिती काशी हिंदू विद्यापीठाच्या विज्ञान संस्थेतील अप्लाईड भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रो. बी.एन.द्विवेदी यांनी दिली.
सूर्य व चंद्र ग्रहणाचे गेल्या अनेक शतकांपासून भारतात जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढे जगात अन्यत्र कुठेच नाही. फ्रान्सचे खगोल शास्त्रज्ञ पियरे जॅानसन यांनी १८६८ मध्ये गुंटूर येथे खग्रास सूर्यग्र्रहणादरम्यान सूर्याच्या क्रोमोस्फीयरच्या स्पेक्ट्रममध्ये एक चमकदार पिवळी रेषा बघितली. त्याचवेळी त्यांनी सूर्यप्रकाश किरणांमधील ५८७.४९ नॅनोमीटर सूक्ष्म तरंग सृष्टीतील एका नव्या घटकामुळे असल्याचे म्हटले होते. नंतर इंग्लंडचे खगोल शास्त्रज्ञ नॉर्मन लॉकियर आणि एडवर्ड फ्रॅकलॅंड यांनी या वायुला हेलियो आणि नंतर हेलियम असे नाव दिले. सूर्यग्रहणादरम्यान या दोन्ही वैज्ञानिकांनी किरणांचा अभ्यास केला नसता तर जगाला हेलियमचा शोधच लागला नसता असे मत द्विवेदी यांनी व्यक्त केले.
यंदा भारताच्या ज्या पट्ट्यातून खग्रास सूर्यग्रहण दिसेल त्यात सूरत, इंदूर, भोपाळ, वाराणसी आणि पाटण्याचा समावेश आहे. शोध व अभ्यासाकरिता वैज्ञानिकांच्या दृष्टीने वाराणसी शहराचे यावेळी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे देश-विदेशातील खगोल शास्त्रज्ञ गंगेच्या किनाऱ्यावर सूर्यग्रहणाचा अभ्यास करणार आहेत. २२ जुलै रोजी वाराणसीतून दिसणारे खग्रास सूर्यग्रहण या शतकातील सर्वाधिक काळ (६ मिनिट ४० सेकंद) चालणारे सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळेच या खगोलीय घटनेकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष लागले आहे. डायमंड रिंग, करोना व बेलीज बिड्स या सूर्यग्रहणाच्या विविध टप्प्यांचा अभ्यास केला जाणार आहे.

No comments: