Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 July, 2009

मूर्तीभंजन प्रकरणी सरकारचे धिंडवडे

विरोधकांकडून गृह खात्यावर अकार्यक्षमतेचा ठपका
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - कुडचड्यात काल (गुरुवारी) घडलेल्या आणि गोव्यात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या देवतांच्या मूर्तिभंजन प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या संदर्भात सभागृहात मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेवर सत्ताधारी तसेच विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत गृह खात्यावर टीकेची झोड उठवली. काही समाजविघातक शक्ती राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात असताना मूर्तिभंजनाच्या घटना रोखण्यात गृह खाते अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी गृहमंत्री रवी नाईक यांनाच लक्ष्य बनवले.
सत्ताधारी गटाचे आमदार श्याम सातार्डेकर व विरोधी गटाचे आमदार दामोदर नाईक यांनी शून्य प्रहराला ही लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती. गोवा हा शांतताप्रिय प्रदेश आहे. परंतु गेल्या तीन वर्षांत मूर्तिभंजनाच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. कोणत्यातरी बाह्यशक्ती येथील शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असून दोन धर्मांत तणाव निर्माण करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट दिसत आहे. कुडचड्यात गेल्या दोन वर्षांत मूर्तिभंजनाच्या पाच घटना घडल्या आहेत. ही प्रकरणे हाताळण्यात गृह खाते अकार्यक्षम ठरल्याचा घणाघाती आरोप सातार्डेकर यांनी केला. या घटनांमागील संशयितांना हुडकून काढण्यास तपास यंत्रणा अपयशी ठरली असून भविष्यात आणखी घटना टाळण्यासाठी तरी अतिरिक्त पोलिस कुमक नेमा अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली.
गेल्या कित्येक विधानसभा सत्रांत याच विषयावर चर्चा झाली आहे. मूर्तिभंजनाच्या घटनांचे गांभीर्य सरकारला आहे का, असा संतप्त सवाल आमदार दामोदर नाईक यांनी केला. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. ते पथक काय करते? एक संशयित कवेश गोसावी हाच मूर्तिभंजनाचे प्रकार घडवून आणतो, असा त्यावेळी सरकारचा हेका होता. आता तर हा संशयित अटकेत आहे. तरीही हे प्रकार चालूच आहेत. याचाच अर्थ काही समाजविघातक बाह्यशक्ती येथे सक्रिय झाल्या आहेत हे स्पष्ट होते असे नाईक यांनी सांगितले. एखाद्या संशयितास अटक केल्यास त्याचा मतपेढीवर परिणाम होईल म्हणून त्यांना मोकळे सोडू नका असे कळकळीचे आवाहन नाईक यांनी गृहमंत्र्यांना केले. हिंदूंच्या श्रध्देचा हा विषय असून तो तेवढ्याच गंभीरतेने हाताळून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
जे विशेष पथक तपासासाठी नेमले आहे त्यांच्याकडे मूर्तिभंजनाखेरीजआणखीही प्रकरणे सोपवली आहेत. या घटना रोखण्यासाठी गुप्तहेर संस्थेचे जाळे विणणे अत्यावश्यक आहे याची जाणीव आतातरी सरकारला व्हायला हवी असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी ठासून सांगितले. विशेष तपास पथकाकडे मूर्तिभंजनाबरोबरच इतर प्रकरणे तपासासाठी देऊन त्यांच्यावर जादा बोजा लादू नका, अशी मागणीही पर्रीकरांनी केली.
दरम्यान, लक्षवेधी सूचनेला व विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना गृहमंत्री रवी नाईक यांनी विशेष तपास पथकाकडे केवळ मूर्तिभंजनाचीच प्रकरणे तपासाकरता सोपवण्याची ग्वाही दिली. कवेशच्या नार्को चाचणीसाठी कायदेशीर प्रक्रिया केली जात असल्याचे सांगून इतर चाचण्यांचे अहवाल येण्याच्या प्रतिक्षेत गृह खाते असल्याचे स्पष्ट केले. कुडचड्यातील कालच्या घटनेप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे रियाझ साजन शेख (शिरवई केपे) व नागराज शांता भाडागार (कुंकळी) अशी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस यंत्रणा वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालत आहे. अशा घटना घडू नयेत यावर पाळत ठेवली जात आहे. तरीही दूरच्या ग्रामीण भागांत अशा घडत आहेत, असे ते म्हणाले.

थातूरमातून उत्तरे नकोत - पर्रीकर
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी तर गृह खात्याची अक्षरशः वाभाडे काढले. याच सरकारने गेल्या वेळी संशयित कवेश गोसावीची नार्को चाचणी करणार असल्याचे जाहीर केले होते. अद्यापही ती झालेली नसून ब्रेन मेपिंग चाचणीचा अहवाल गेले काही महिने पडून आहे. गृहमंत्री स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी थातूरमातूर उत्तरे देत असून सरकार या घटनांकडे गांभीर्याने पाहाणार का, असा सवाल पर्रीकर यांनी संतप्त स्वरात केला.

No comments: