Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 June, 2009

खाण ट्रकचालकांपुढे "आरटीओ'ही हतबल

वाहतूक संचालकांची अस्थायी समितीसमोर कैफियत

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई करण्यास गेल्यास ते "आरटीओ'च्या वाहनांवर आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक करून मारहाण करतात, अशी माहिती आज वाहतूक खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक आणि पंचायत खात्याच्या संसदीय अस्थायी समितीच्या बैठकीत दिली. आमदार बाबू कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मये मतदारसंघाचे आमदार अनंत शेट, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक तसेच फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. लोलयेकर यांच्या या माहितीवरुन वाहतूक खाते या ट्रकमालक व चालकांसमोर हतबल झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप नेते डॉ. प्रमोद सावंत यांनी पाळी परिसरात निष्काळजीपणे खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांमुळे सामान्य दुचाकी वाहनचालकांचे बळी जात असल्याने या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली. या प्रश्नावर उत्तर देताना संचालक लोलयेकर म्हणाले, या ट्रकचालकांवर कारवाई करणे ही डोकेदुखी झाली आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक खात्याच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली तर, चार "आरटीओ'ना दीडशे ट्रकचालक मारहाण करण्यास आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या ट्रकचालकांवर पोलिसही कारवाई करीत नसल्याचे ते म्हणाले. श्री. लोलयेकर यांच्या या उत्तरामुळे खनिज वाहतूक होणाऱ्या परिसरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे स्पष्ट होत आहे.
पाळी भागात गेल्या सात महिन्यांत १९० अपघात झाले आहे, तर सहा महिन्यांत सहा जणांचे प्राण गेले आहेत. रस्ता अरुंद असल्याने भरधाव येणारे ट्रक दुचाक्यांना धडक देतात, त्यामुळे कोणतीही चूक नसताना दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागतात. दिवसांतून ५ ते ६ वेळा रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी त्याठिकाणी पोलिसही उपस्थित नसतात. खनिज मालाचे ट्रक तासंनतास रस्त्याच्या बाजूला उभे करून ठेवले जातात. रस्त्याची एकदम दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर दुचाकीवरून प्रवास करून त्याचा अनुभव घ्यावा, असेही डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
वाहतूक विषयावर बोलताना माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्वीस म्हणाले की, गोव्यात सार्वजनिक वाहतूक अत्यंत कमकुवत आहे. रस्ते अरुंद आहे. सा. बां. खात्याने दर पाच वर्षांनी कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता प्रत्येक रस्त्याची दुरुस्ती करुन तो हॉटमिक्स करावा, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. दर पाच पाच वर्षांनी रस्त्याचे दुरुस्ती काम करण्यास खात्याकडे एवढा निधी नसून ते करण्यासाठी किमान पाचशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे यावेळी खात्याचे मुख्य अभियंते वाच्यासुंदर यांनी सांगितले. रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम सुरूच असून याला लोक विरोध करीत असल्याचे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. लोकांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे रुदींकरण करणे सोपे होईल,असे ते म्हणाले.
फोंडा येथे बसस्थानक उभारण्यासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत तर, साखळी येथे असलेला बसस्थानक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याचा मुद्दा यावेळी सागर जावडेकर यांनी मांडला. फोंड्यातील बसस्थानकाचा तसा उपयोगही होत नाही. परंतु, त्यावर करोडो रुपये खर्च झाले आहेत. शिरोडा येथे भव्य बसस्थानक उभारण्यात आला मात्र ते वापराविना तसाच पडलेला आहे. बसस्थानक बांधण्यासंदर्भात सरकारने धोरण स्पष्ट करावे, असे श्री. जावडेकर म्हणाले.

No comments: