Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 2 June, 2009

"आर्यन'चे हिरे चमकले..


अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा


पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांत यंदाही गोव्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादले आहे."आयआयटीजेईई',"एआयईईई', आणि "बीटसेट' अशा विविध प्रवेश परीक्षांत गोव्यातील विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. यात "आर्यन स्टडी सर्कल' च्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी दिली.
आज पणजी येथे बोलावल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते."आर्यन स्टडी सर्कल'तर्फे या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांसाठी योग्य ते मार्गदर्शन दिले जाते. सुरुवातीला प्रवेश देताना बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते व विद्यार्थ्यांची खास मुलाखत घेऊन त्यांच्यातील कमतरता हेरली जाते.पुढे प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कमतरतेवर मात करण्यास मदत केली जाते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. गेल्या चार वर्षांत गोव्यातील विद्यार्थी "आयआयटी' प्रवेश परीक्षांत विशेष चमक दाखवत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
गेल्या वर्षी एकूण १० विद्यार्थी "आयआयटी'प्रवेश परीक्षेत यशस्वी ठरले होते व त्यातील आठ विद्यार्थी आर्यन स्टडी सेंटरचे होते.यावर्षी हा आकडा वाढून एकूण १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत यशस्वी ठरले आहेत. त्यातील १२ विद्यार्थी आर्यन स्टडी सेंटरचे आहेत,असेही ते म्हणाले. एकूण ४४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती व त्यातील ३० विद्यार्थी निवडले गेले. या ४४ विद्यार्थ्यांतील ४२ विद्यार्थी आर्यन स्टडी सेंटरचे होते. अनीष तांबसे हा यादीत पहिला आल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.त्यात दर्शन वारीयर, भूषण बोरकर, रोहित गिरी, अभिषेक एगल, अपूर्वा वेर्लेकर, एन्रीच ब्राझ, इशान जोशी, प्रणव वैद्य, शान आकेरकर, परम आलवेणकर,सोहील वेलजी यांचा समावेश आहे.
या यादीत अपूर्वा बोरकर या गुणवत्ता यादीतील एकमेव मुलीचाही समावेश आहे. अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी गोव्यासाठी २५ ते ३० जागा असतात.यावेळी एकूण २५ विद्यार्थी यशस्वी ठरले व त्यातील २२ विद्यार्थी आर्यन स्टडी सेंटरचे होते,असे ते म्हणाले.
यापूर्वी वैद्यकीय क्षेत्राकडे वळणारे विद्यार्थी मोठ्याप्रमाणात अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळत आहेत.वैद्यकीय क्षेत्रात अभ्यासक्रमाची कालमर्यादा मोठी असते व त्यात प्रत्यक्षात प्राप्तीचा मार्गही उशिरा सापडतो; परंतु अभियांत्रिकी क्षेत्रात मात्र एकदा अभ्यासक्रम संपला की लगेच नोकरी मिळते व प्राप्ती सुरू होते, हे एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्यन स्टडी सेंटर ही संस्था २००४ साली स्थापन करण्यात आली. या संस्थेची पहिली तुकडी २००६ साली निवडण्यात आली. या संस्थेकडे अकरावी व बारावीचे धरून एकूण ३०० विद्यार्थी सध्या प्रवेश परीक्षेचे शिक्षण घेत आहेत. दिवसाला सहा तास प्रशिक्षण व सुट्टीच्या दिवसांत १२ तास प्रशिक्षण या संस्थेतर्फे देण्यात येते. मुळात शालान्त परीक्षेचा निकाल होण्यापूर्वीच या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो,अशी माहिती श्री. प्रभुदेसाई यांनी दिली.

No comments: