Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 June, 2009

मजबूत खटल्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न

फोंडा, दि. २ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याने कबुली दिलेल्या १६ खून प्रकरणांचा तपास सुरू असून महानंद विरोधात मजबूत खटला उभा करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
महानंदाने आपल्या जबानीत उघड केलेल्या जागेत सापडलेल्या मानवी हाडांची आधुनिक पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्या युवतींची हाडे सापडली. त्या युवतींच्या कुटुंबीयांची "डीएनए' चाचणी घेतली जाणार आहे. एका युवतीच्या कुटुंबीयांचे डीएनए तपासणीसाठी रक्त ताब्यात घेऊन "ते' तपासणीसाठी हैदराबाद येथील न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना राय, बांबोळी आणि केरये खांडेपार येथे मानवी हाडे सापडली आहेत. राय आणि बांबोळी येथे खड्डा खोदून मानवी हाडे ताब्यात घेण्यात आली आहेत. राय येथे निरंकाल येथील कु. अंजनी गांवकर हिचा खून केल्याची कबुली दिली आहे. बांबोळी येथे कुडका येथील कु. सुशीला फातर्पेकर हिचा खून केल्याची कबुली दिली आहे. केरये खांडेपार येथे सापडलेली हाडे कुणाची हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तपास सुरू आहे. सत्तरी येथे खून करण्यात आलेल्या योगिता नाईक हिच्या मृतदेहाची ओळख न पटल्याने वाळपई पोलिसांनी त्याची विल्हेवाट लावली होती. या मृतदेहाचा "व्हिसेरा' राखून ठेवण्यात आला होता. तो व्हिसेरा, हाडे हस्तगत करून तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठविण्यात आलेली आहेत.
येथील पोलिसांनी विविध खून प्रकरणांशी संबंधित घटनांच्या तपासकामावर भर दिला आहे. खटल्यासाठी आवश्यक पुरावे, माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणी उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, संजय दळवी, लक्षी आमोणकर, सचिन पन्हाळकर, सचिन लोकरे, तुकाराम चव्हाण, निखिल पालेकर तपास करीत आहेत.
जनजागृतीसाठी खास बैठक
दरम्यान, फोंड्यातील समविचारी महिलांची बैठक खडपाबांध फोंडा येथील महिला प्रशिक्षण केंद्रात नुकतीच घेण्यात आली. गोव्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचार, बळी या विषयासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या गोव्यात गाजत असलेल्या महानंद नाईक खून सत्राच्या पार्श्वभूमीवर यापुढे अशा घटनांना मुलींनी बळी पडू नये याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. या गुन्ह्याची पाळेमुळे अगदी खोलावर रुजल्यामुळे समाजाच्या तळागळापर्यत जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी फोंडा तालुक्यात एक "महिला शक्ती संघटना' स्थापन करण्याची विचार पुढे आला आहे.
समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ही एक चळवळ असून या चळवळीत फोंडा तालुक्यातील सर्व महिला मंडळे, स्वयं साहाय्य गट, महिला पंच, सरपंच यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. महिला मंडळ, स्वयंसेवा गट यातील किमान दोन तरी महिलांनी या संघटनेत सामील व्हावेत तरच आपल्या मुलींना आपण महानंदपासून वाचवू, कारण यापुढे अनेक महानंद निर्माण होती. त्यासाठी आपण आधीच सावध असले पाहिजे. ही महिला शक्ती संघटना राजकारणापासून दूर, विनामूल्य, सेवाभावी वृत्तीने कार्य करणार आहे. यासंबंधीची पुढील बैठक घेण्याआधी १५ जून ०९ पूर्वी २३१९५५३ या क्रमांकावर संपर्क साधून महिलांनी नावनोंदणी करावी. त्यानंतर पुढील रूपरेषा ठरविता येईल, असे कळवण्यात आले आहे.

No comments: