Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 June, 2009

निःपक्षपातीपणाची मीराकुमार यांची ग्वाही

एकमताने सभापतिपदी निवड

नवी दिल्ली, दि. ३ - लोकसभा सभागृहाचा गौरव आणि सभागृहातील सदस्यांचा सन्मान राखताना माझ्याकडून कोणाचेही मन दुखविले जाणार नाही. आपले काम करीत असताना मी कोणालाही तक्रारीची संधी देणार नाही. विरोधी पक्षांसोबत कोणताही पक्षपात करणार नाही, तर सत्तापक्षाला कोणत्याही तक्रारीची संधी देणार नाही, असे प्रतिपादन नवनियुक्त लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी आज येथे केले.
सभागृहाने एकमताने निवड केल्यानंतर आपला कार्यभार स्वीकारल्यावर बोलताना मीरा कुमार म्हणाल्या की, आज जे झाले ते अभूतपूर्व आहे. या सभागृहाने ५७ वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज एका महिलेला सभापतिपदावर बसण्याचा निर्णय घेऊन इतिहास घडविला आहे, एक उज्ज्वल विक्रम प्रस्थापित केला आहे. आपण मला जो सन्मान दिला, त्याचा मी विनम्रतापूर्वक स्वीकार करते.
आज आम्हाला जे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे, त्याला आम्ही स्वातंत्र्य म्हणू शकत नाही. ते केवळ एक राजकीय स्वातंत्र्य आहे, असे सांगून मीरा कुमार म्हणाल्या की, आम्ही अद्याप मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावू शकलो नाहीत, गरिबीच्या समस्येवर तोडगा काढू शकलो नाही, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुरवू शकलो नाहीत, सर्व प्रकारच्या शोषणातून त्यांची मुक्तता करू शकलो नाही, त्यांच्या चौफेर विकासाच्या संधी त्यांना उपलब्ध करून देऊ शकलो नाही. जोपर्यंत हे सर्व त्यांना दिले जात नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घेता येणार नाही.
सरकारने लवकरात लवकर आपल्या आश्वासनांची पूर्तता करायला हवी. युवक उतावीळ होतील, अशा कोणत्याही संधी त्यांना द्यायला नकोत. आजच्या युवा वर्गाला आपल्या मताची किंमत समजली आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर निघून मतदान केले आहे, हे आपल्याला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे या युवा भारताच्या आकांक्षांची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळाले नाही तर ते उतावळे होतात आणि कोणतेही कृत्य करू शकतात. त्यामुळे त्यांना अशी संधीच दिली जाऊ नये, असे आग्रही प्रतिपादनही मीरा कुमार केले.
जनतेला आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आम्ही चांगले शासन करू शकतो, अशी जनतेची अपेक्षा आहे. भलेही आम्ही सत्तापक्षात असो की विरोधी. आम्हाला जनतेला चांगले शासन द्यायचे आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील चांगले सरकार देण्यासाठी सभागृहातील सर्वच सदस्यांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
सभागृहाच्या गौरवमयी परंपरेनुसार आपण मला पूर्ण सहकार्य करा, जेणेकरून आपण माझ्यावर टाकलेली घटनात्मक जबाबदारी मी पार पाडू शकेल, असे आवाहनही त्यांनी सभागृहातील सर्व जुन्या व नव्या सदस्यांना संबोधून केले. सभागृहातील सर्वच वर्गांकडे माझे समान लक्ष राहील. विरोधी पक्ष व सत्ता पक्ष यांना मी समान वागणूक देईल, असे आश्वासनही मीरा कुमार यांनी सभागृहाला दिले.
सभागृहाचे यशस्वी माजी सभापती गणेश वासुदेव मावळंकरांपासून ते सोमनाथ चॅटर्जीपर्यंत या सर्वांच्या आदर्शांची मला जाणीव आहे. या साऱ्यांनी सभापतिपदाचा गौरव कायम राखला आहे, असे सांगून मीरा कुमार म्हणाल्या की, तसाच प्रयत्न मी करीन.
जनतेपासून स्वत: दूर ठेवले तर खासदारांचे अस्तित्वच राहात नाही. आपल्या मतदारांना आपल्यापासून काय अपेक्षा आहेत, हे आपण जाणले पाहिजे. त्यांच्या गरजा, त्यांच्या मागण्या खासदारांनी सभागृहापुढे मांडव्यात अशी या जनतेची अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या. सभागृहाच्या कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्यांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही चर्चा व वादविवाद अवश्य करू शकतो. एखाद्या मुद्याबाबत असहमतीही दर्शवू शकतो. मात्र, त्यासाठी आक्रमक धोरण न ठेवता शालीन पद्धतीचा वापर करावा आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळे निर्माण करू नये.
संसदेचे कामकाज ठप्प पाडले जावे, असे या देशातील जनतेला अजीबात वाटत नाही. त्यामुळे सदस्यांनी जनतेचा अपेक्षाभंग होईल, असे कोणतेही वर्तन करू नये, असे आवाहनही देशाच्या पहिल्या महिला सभापतींनी सभागृहातील सदस्यांना केले.

No comments: