Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 June, 2009

भिकारी प्रकरणी तिघे पोलिस दोषी

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - शॅल्टोन नामक भिकाऱ्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन टाकल्याप्रकरणी पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस हवालदार, पोलिस शिपाई व वाहन चालक दोषी आढळले असून पोलिस महानिरीक्षक त्यांच्यावर शिस्तभंगाची योग्य कारवाई करणार असल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी पत्रकारांना दिली.
उपअधीक्षक शांबा सावंत यांनी केलेल्या तपासात भिकाऱ्याला घेऊन गेलेल्या त्या पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनात असलेले पोलिस हवालदार पी. म्हामल, पोलिस शिपाई एस. कुडणेकर व वाहन चालक आर आर. तांबसे हे तिघे दोषी आढळून आले आहेत. पोलिस खात्याला न शोभणारे असे या पोलिसांनी कार्य केले असून यापुढे पुन्हा अशा घटना घडू नयेत, त्यासाठी सर्व पोलिस स्थानकासाठी परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहिती यावेळी श्री. देशपांडे यांनी दिली. यापुढे अशा घटना हाताळताना पूर्ण काळजी घेण्याचीही सल्ला पोलिसांना देण्यात आला आहे. पोलिस नियंत्रण कक्षात असलेल्या पोलिसांनी मानवी दृष्टिकोनातून आपली ड्यूटी केली पाहिजे. तत्पर सेवा देण्यासाठी आणि अडचणीत सापडलेल्यांना आधार देण्यासाठी या सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. आधीच दुःखात असलेल्या आणि आजारी असलेल्या भिकाऱ्यांना अशी वागणूक मिळाल्यास ते योग्य होणार नसल्याचे मत यावेळी श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले.
पोलिस चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, त्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता पणजी बाजारातून पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी आला की, एका व्हाईन शॉपच्या समोर एक भिकारी असून तो उपद्रव करतो. या दूरध्वनीची दखल घेऊन बाजाराच्या जवळ असलेल्या नियंत्रण कक्षाच्या पोलिस वाहनाला माहिती देण्यात आली तसेच १०८ रुग्णसेविकेला त्याठिकाणी जाण्याची सूचना करण्यात आली. सर्वांत आधी त्याठिकाणी १०८ रुग्ण सेवा वाहन पोचले. त्याच्यापाठोपाठ पोलिस वाहन गेले. यावेळी १०८ वाहनातील सेविकेने त्या भिकाऱ्याच्या आरोग्याची तपासणी केली. त्याला कोणताही आजार नसल्याचे उघड झाल्याने त्यांनी आम्ही त्याला इस्पितळात नेत नसल्याचे सांगितले. तसेच याच भिकाऱ्याला यापूर्वी १०८ वाहनाने अनेकवेळा इस्पितळात दाखल केल्याचे त्या रुग्णसेवा वाहनाच्या चालकाने पोलिसांनी सांगितले आणि ते निघून गेले. त्यानंतर तो दुकान मालक त्या भिकाऱ्याला घेऊन जाण्यासाठी पोलिसांच्या मागे लागल्याने त्याला पोलिसांनी आपल्या जीपमधे घेतले आणि कदंब बसस्थानकाच्या दिशेने घेऊन गेले. यावेळी त्या भिकाऱ्याने कंापाल येथे एका गल्लीत आपला ओळखीची व्यक्ती राहत असल्याने त्याठिकाणी नेऊन सोडण्याची विनंती केली. त्यामुळे कंापाल येथे त्याला सोडण्यात आल्याचे आपल्या बचावासाठी त्या पोलिस शिपायांनी चौकशी अधिकाऱ्याला दिली. परंतु, त्या भिकाऱ्याला कंापाल येथे सोडण्यात आल्याची माहिती त्याचवेळी बिनतारी संदेशाद्वारे नियंत्रण कक्षाला देण्यात आली नसल्याने आणि त्यांच्या जबानीत तफावत आढळून आल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
हा एका भिकाऱ्याचा प्रश्न नसून शहरात उपद्रव करणाऱ्या अन्य भिकाऱ्यांचे काय करायचे, हा मोठा प्रश्न असून त्यासाठी कायद्यात योग्य बदल करण्याची गरज असल्याचे मत यावेळी श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले. शहरात येणारे ९९.९९ टक्के भिकारी हे बिगर गोमंतकीय आहे. यातील सर्वच भिकारी हे परिस्थितीने बनवलेले नसून त्यात काही व्यावसायिक भिकारी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. भिकारी प्रतिबंधक कायदा अपुरा पडत असून त्यात बदल करण्याची गरज आहे. तसेच या भिकाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी समाज कल्याण खात्याने याची दखल घ्यावी, असेही श्री. देशपांडे म्हणाले.

No comments: