Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 June, 2009

अहवालानंतर कारवाईचे वनमंत्र्यांचे संकेत

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - केरी सत्तरी येथे वाघाच्या हत्येचे महत्त्वाचे पुरावे वन खात्याने मिळवले असून या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. वनमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल येत्या शुक्रवारपर्यंत आपल्याला सादर करण्याचे आदेश वन खात्याला दिले आहेत. हा अहवाल सरकारसमोर ठेवल्यानंतर पुढील कृतीबाबत निर्णय घेतला जाईल,अशी माहिती त्यांनी "गोवादूत'शीे बोलताना दिली.
वन खात्याचे उपविभागीय वनाधिकारी सुभाष हेन्रीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केरी सत्तरी येथे झालेल्या पट्टेरी वाघाच्या हत्येचे महत्त्वाचे पुरावे मिळवले आहेत. याप्रकरणी चौकशी अहवाल वनमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांना सुपूर्द करण्यात आला. हा अहवाल अपूर्ण असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती देणारा अहवाल येत्या शुक्रवारपर्यंत सादर करा,असे आदेश आपण वनखात्याला दिल्याचे मंत्री श्री. नेरी म्हणाले. केरी गावातील एका काजू वनात जळालेल्या जागेत वाघाच्या पायाचा पंजा व हाडे सापडली आहेत. ही जागा केरी गावातील माजीकवाड्यापासून केवळ ३ किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान, केरी येथील गणेश माजिक याच्या मालकीच्या काजू वनात हे अवशेष सापडल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. याठिकाणी वाघाची कवटी व इतर महत्त्वाच्या अवयवांचे अवशेष सापडले नसले तरी या जागेच्या जवळच वाघाचे सात दात व रक्त सांडलेली काही पाने सापडली आहेत. हे सर्व अवशेष भारतीय वन्यजीव संस्था,डेहराडून येथे पाठवण्यात आले आहेत व तेथील अहवालानंतरच हे अवयव वाघाचे आहेत की काय,हे स्पष्ट होणार असल्याची माहिती वनखात्याने दिली.
वाघाची हत्या करणे हा वन्य संरक्षण कायद्याअंतर्गत मोठा गुन्हा आहेच वरून पुरावे नष्ट करणे हा त्याहूनही गंभीर गुन्हा आहे,अशी माहिती श्री.हेन्रीक यांनी दिली. याप्रकरणी वन खात्याकडून यापूर्वी अंकुश रामा माजिक,गोपाळ माजिक व भीवा ऊर्फ पिंटू गावस यांना अटक केली होती व नंतर त्यांना सोडण्यातही आले.

No comments: