Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 31 May, 2009

एम. बॉयर यांचे देहावसान

अभिजात तियात्र कला पर्वाचा अस्त

मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी) - गोमंतकीय तियात्राला लोकमान्यता मिळवून देण्याबरोबरच गेले अर्धशतक या लोककलेवर साम्राज्य गाजवणारे अभिजात गोमंतकीय तियात्रिस्त एम. बॉयर यांचे आज राय या त्यांच्या गावी प्रदीर्घ आजारानंतर देहावसान झाले व अस्सल गोमंतकीय तियात्रकलेतील एक पर्व संपले.
त्यांचे खरे नाव मानुएल सांतान आगियार. निधनसमयी ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मारीया व ५ पुत्र असा परिवार आहे. त्यांचे पुत्र विदेशांत असून त्यांच्या परतण्यावर एम. बॉयर यांच्या अंत्यसंस्काराची तारीख पक्की होणार आहे.
बॉयर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३० रोजी फोंडा येथे झाला.बालपणातच त्यांच्यातील तियात्राचे अंगभूत गुण दिसून येत होते. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे संगीतबद्ध करून सादर केले त्यावेळी त्यांची जी मुक्त प्रशंसा झाली तिनेच त्यांच्या तियात्र जीवनाचा पाया घातला गेला असे मानतात. शालेय जीवनात त्यांना शाळेच्या कडक निर्बंधांमुळे आपल्या आवडीला मुरड घालावी लागली. तथापि, त्यातून त्यांनी नवी युक्ती काढली व एम.टेलर या नावाने एका ठिकाणी काम केले. मात्र प्राचार्यांनी त्यांना रंगेहात पकडले व समजही दिली. अर्थात, त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही व नंतर ते एम. बॉयर याच नावाने रंगमंचावर आले.
"रिणकारी' हे त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीं लिहून रंगमंचावर आणलेले पहिले तियात्र. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.स्वतःच्या बुध्दीमत्तेच्या जोरावर त्यांनी २५ वर खेळ तियात्र स्वतः लिहून, निर्मिती, निर्देशक, संगीत दिग्दर्शक व कलाकार अशा विविध रुपांतून रंगमंचावर आणले. एकूण ५०० वर तियात्रांतून कामे केली. हजारावर गाण्यांना संगीत दिले व स्वतः ती म्हटली. भारतांतील प्रमुख शहरांबरोबरच विदेशातील अनेक प्रमुख शहरांतही त्यांनी तियात्र सादर केले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तियात्रकलेला कित्येक नवे कलाकार मिळू शकले.
तियात्र हे फक्त मनोरंजनाचे साधन असूं नये तर समाज शिक्षण व जागृतीसाठीचे साधन म्हणून त्याचा वापर व्हावा अशी त्यांची धारणा होती. त्याच उद्देशाने त्यांनी नैतिकता, शांतत व सलोखा या मुद्यांवर भर देऊन "एकूच रोस्तो',"चिंतना जाली सोपनां',"संसार सुदरलो , "भुरगी आनी भांगर' ,"आदीं तें आतां हे','घर दुखी गांव सुखी' , "मोग काजार , डायवोर्स' सारख्या तियात्रांची निर्मिती केली.
गोमंतकीय कोकणी तियाश्रासाठी त्यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल वेळोवेळी विविध स्तरांवर घेतलेली आहे.गोवा मुक्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग हस्ते त्यांचा सत्कार झाला होता.त्यापूर्वी राज्य सांस्कृतिक पुरस्कार, मॅन ऑफ द इयर, अमिताभ बच्चन यांच्या हस्ते "गोवा पोस्ट' पुरस्कार, राष्ट्रपतींहस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार, गुलाब, गोवा हिंदू असोसिएशन, कुळागर प्रकाशन, आयटक, सम्राट क्लब असे पुरस्कारही त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. कुवेतमध्ये झालेल्या सत्काराची व दिल्या गेलेल्या पुरस्काराची आठवण ते वरचेवर काढत असत.

No comments: