Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 31 May, 2009

प्रा. मयेकरांचे जीवन सोन्याच्या पिंपळासारखे

स्वामी प्रज्ञानंद यांचे प्रतिपादन; सद्भाव ग्रंथाचे थाटात प्रकाशन
पणजी, दि.३०(प्रतिनिधी) - प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलीच्या भेटीचा दिव्य अनुभव हा प्रा.गोपाळराव मयेकरांच्या व्याख्यानांतून अनुभवयास मिळतो. हे "संपन्न' व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.ते जीवनात राजहंसासारखे जगले.आपल्या जगण्यात मूल्यांची प्रतिष्ठा राखून व नेहमीच सत्याच्या शोधार्थ त्यांनी साधना केलेले आयुष्य म्हणजे जणू सोन्याच्या पिंपळासारखे चैतन्यदायी व सळसळणारे असल्याने भावी पिढीसाठी ते नेहमीच स्फूर्तिदायी ठरेल, असे प्रतिपादन संत साहित्याचे थोर अभ्यासक प्रा.मधुकर कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी केले.
कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये प्राचार्य गोपाळराव मयेकर अमृतमहोत्सवी सद्भाव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी अमृतमहोत्सवमूर्ती प्रा.गोपाळराव मयेकर,सौ.उषाताई मयेकर, ग्रंथाचे संपादक परेश प्रभू, ग्रंथाची सजावट केलेले गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर आदी हजर होते.स्वामी प्रज्ञानंद यांच्या हस्ते "सोन्याचा पिंपळ' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर तथा प्रा.मयेकर यांचे अनेक हितचिंतक उपस्थित होते.
स्वामी प्रज्ञानंद पुढे म्हणाले की गौरव ग्रंथ कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ या ग्रंथाने दिला आहे. प्रा. मयेकर यांच्या संजीवक विचारधारा आणि आनंदमय भावलहरींनी संपन्न असाच हा सद्भाव ग्रंथ झाला आहे. आज माणूस हिंसक बनत चालला आहे.माणुसकी,प्रेम,कर्तव्य याचा झपाट्याने ऱ्हास होत चालला आहे. विज्ञानाच्या या युगात आता जास्तीत जास्त लोक धर्म व अध्यात्माकडे वळत आहे..ईश्वर निष्ठेशिवाय तरणोपाय नाही,हेच सिद्ध होते आहे.
प्रा.मयेकर यांनी मनोगतात आपल्या जीवनप्रवासात वेळोवळी प्रेरणा व आपल्या सुखदुखःत साथ दिलेल्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आपला जीवन प्रवास हा जणू शिवधनुष्यच होता परंतु या ग्रंथामुळे मात्र हा शिवधनुष्य इंद्रधनुष्य बनला,अशा शब्दांत त्यांनी या अनोख्या ग्रंथाची वाखाणणी केली. लोकप्रंशसा ही अजिबात वाईट नाही,असे म्हणून लोकांच्या या प्रेमामुळे जीवनात काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते.आपण अध्यात्माकडे वळलो असलो तरी प्रपंचाकडे मात्र आपण अजिबात दुर्लक्ष केले नाही,असेही त्यांनी प्रांजळपणे मान्य केले.सुरुवातीच्या काळात कामगार चळवळीच्या वातावरणात गेल्याने राजकारणात प्रवेश केला,असे सांगून गोव्याचे भाग्यविधाते स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांनी राजकीय प्रवेश घडवून आपल्याला नावारूपाला आणले,असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपली वाणी व स्मरणशक्ती जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत समाजाला चांगलं देण्यासाठी झटत राहीन,असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी सुरुवातीला संपादक मंडळाचे सदस्य प्रा.अनिल सामंत यांनी ग्रंथाबाबत प्रास्ताविक केले.
परेश प्रभू यांनी ग्रंथ रचनेबाबत आढावा घेतला.प्रा.मयेकर यांचे विद्यार्थी असलेले व खास देवगड इथून या कार्यक्रमाला हजर राहिलेले कवी प्रमोद जोशी यांनी प्रा.मयेकर यांच्यावर भावनांनी ओथंबलेली कविता सादर केली तेव्हा सारे वातावरण भावुक बनले. .प्रा.प्रवीण गांवकर यांनी प्रा.मयेकरांच्या शब्दांतील कवितांना स्वरबद्ध करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांना विष्णू शिरोडकर यांनी संवादिनीवर साथ केली. नितीन कोरगावकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात "आर्ट सर्कल' देवगड निर्मित "स्वरांजली' हा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

No comments: