Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 June, 2009

"क्रीडानगरी'बाबत कृषी खाते अंधारात!

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - हजारो झाडांची कत्तल आणि शेती जमीन बुजवून शेतकऱ्यांना भिकेला लावणारी धारगळ येथे क्रीडा नगरी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देताना कृषी खात्याला विश्वासात घेण्यात आले नसल्याचा गौप्यस्फोट आज खात्याचे संचालक सतीश तेंडुलकर यांनी केला. धारगळ येथील ११ हजार चौरस मीटर जमिनीवर ही क्रीडानगरी उभारण्यात येत असल्याने आज कृषी खाते अस्थायी समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पणजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर याच्या अध्यक्षतेखाली खाली झालेल्या या बैठकीला धारगळ परिसरातली शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडवडिलांनी टिकवून ठेवलेली शेती आणि काजू बागायती नष्ट करून त्या जमिनीवर क्रीडा नगरी उभारण्याची भाषा करणारे क्रीडा मंत्री बाबू आजगावकर हे वृक्षारोपण करण्याची भाषा करीत आहे. श्री. आजगावकर यांनी आता पर्यंत किती झाडे लावली आहेत ते आधी सांगावे, असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी कृषी खात्याची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, कृषी खातेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून क्रीडा नगरीच्या मागे असल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अथक प्रयत्नानंतर तिळारी धरणाचे पाणी येथील शेतीसाठी वापरण्यासाठी करोडे रुपये खर्च करून कालवा खोदण्यात आला आहे. या पाण्यातून येथील शेती टिकवण्यात आली असून क्रीडा मंत्री ही शेतीच नष्ट करण्यास पुढे आल्याने त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री आजगावकर यांच्या विरोधात जोरदार भूमिका घेतली तसेच त्याच्या या क्रीडा नगरीलाही तीव्र विरोध दर्शविला.
मानशीचा बांध फुटून खाजन शेतीची नुकसानी होत असल्याने त्याची वेळोवेळी डागडुजी करण्याची जबाबदारी कूळ संघटनेकडे सोपवण्यात आल्याची माहिती यावेळी संचालक तेंडुलकर यांनी दिली. मानस फुटून पाणी शेतात येत असल्याने हजारो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते. त्यामुळे यावेळी या प्रश्नाकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी श्री. तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण दिले. परंतु, कूळ संघटना या प्रश्न हाताळण्यास कमी पडत असल्याने याकडे कृषी खात्यानेच लक्ष पुरवण्याची सूचना समितीची अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावेळी केली.
बेडकांची शिकार करणाऱ्यावर आणि हॉटेलमध्ये त्याचे पदार्थ विक्री करणाऱ्या हॉटेलवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी वन खात्याचे मुख्य वनपाल शशीकूमार यांनी सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणात बेडकांची शिकार केली जात असल्याने त्याच्याविरोधात कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. कुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वनखात्याकडे पणजीतील कोणत्या हॉटेलमध्ये "जंपिग चिकन' दिले जाते, याची यादी असून त्या हॉटेलवर अचानक छापा टाकून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments: