Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 1 April, 2009

श्रीपाद नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विजयी हॅट्ट्रिकसाठी मतदार व भाजप सज्ज
पणजी, दि. ३१(प्रतिनिधी): भाजपचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी आज उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. सकाळी पणजी येथील श्री देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.उत्तर गोव्याची जनता भाजपच्या विजयासाठी पूर्णपणे सज्ज झाली असून यंदा भाजप हॅट्ट्रिक साधेल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीपाद नाईक यांनी पणजीचे ग्रामदैवत श्री देवी महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेतला.यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर,म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, तसेच पक्षाचे बहुतेक आमदार,पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते हजर होते. त्यानंतर श्रीपाद नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी कर्नाटकचे मत्सोद्योग,विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री आनंद अस्नोटीकर यांनी खास हजेरी लावून श्री. नाईक यांना शुभेच्छा दिल्या. कॉंग्रेस सरकारने राष्ट्रीय तथा स्थानिक पातळीवर सामान्य लोकांचे जगणे कठीण करून ठेवले आहे. मुखात "आम आदमी'चे नाव घेऊन प्रत्यक्षात सामान्य लोकांसाठी काहीही न करता भ्रष्टाचारात गुंतलेल्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी जनता सज्ज असल्याचेही ते म्हणाले.
देशावर दहशतवादाचे संकट उभे ठाकले असताना त्याचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेसकडे खंबीर नेतृत्व नाही. या सरकारकडे निर्णय क्षमताच नसल्याने सगळेच विषय भिजत पडले आहेत,अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. स्थानिक तथा देशपातळीवर सामान्य लोकांचा या सरकाराविरोधातील रोष वाढला असून त्याची परिणती मतदानाव्दारे स्पष्ट होईल,असेही ते म्हणाले.उत्तर गोव्यातील जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता यंदा ही जनता भाजपला लागोपाठ तिसरा विजय मिळवून देईल यात शंकाच नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्रकारांना मज्जाव
यंदा उमेदवारी अर्ज सादर करताना प्रथमच उमेदवाराचा फोटोे घेण्यास किंवा त्याच्याबरोबर जिल्हाधिकारी किंवा मामलेदार कार्यालयात प्रवेश करण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे पत्रकारांनी संताप व्यक्त केला. निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारासोबत फक्त चार व्यक्तींना प्रवेश देण्याची मुभा आहे. हाच आदेश पत्रकारांनाही लागू करण्यात आला. आज उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी पत्रकारांना प्रवेश नाकारल्यानेगोंधळ निर्माण झाला. यावेळी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष सुहासिनी प्रभुगावकर यांनी जाब विचारला असता त्यांना उमेदवारांसाठी लागू करण्यात आलेल्या आदेशाची प्रत काढून दाखवण्यात आली. दरम्यान,काल उमेदवारासोबत पत्रकारही जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्याने ते बरेच संतापले व त्यांनी पोलिसांना खडसावून काढले.दरम्यान,जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्रकार संघटनेच्यावतीने विचारण्यात आले असता त्यांनीही निवडणूक आयोगाचा सदर आदेश दाखवून त्यांना प्रवेश देण्यास सक्त मनाई केली. यासंबंधी निवडणूक आयोगाकडेच स्पष्टीकरण मागवण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला आहे.

No comments: