Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 2 April, 2009

...तर इतिहासाच्या पुस्तकाची सामूहिक होळी

हिंदू जनजागृती समितीचा इशारा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): 'इतिहासाचे हिरवेकरण' केलेले एनसीईआरटीचे पुस्तक मागे न घेतल्यास या पुस्तकाची सामूहिक होळी केली जाणार असल्याचा इशारा देत हिंदूंनी आगामी लोकसभा मतदान प्रबोधन चळवळीत सक्रिय भाग घेण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक जयेश थळी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांना दुय्यम स्थान देणारे इतिहासाचे पुस्तक खपवून घेतले जाणार नसून सदर वादग्रस्त पाठ्यपुस्तक त्वरित रद्द करण्याची मागणी आज पणजी बसस्थानकावरील हनुमान मंदिरासमोर घेण्यात आलेल्या सभेत करण्यात आली. 'एनसीईआरटी'चा पुतळा करून त्याची अंत्ययात्रा काढून मांडवी नदीत जलसमाधी देण्यात आली. यावेळी शेकडो हिंदू धर्माभिमानी, पालक, शिक्षक तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सर्व वक्त्यांनी सरकारवर आणि सरकारच्या शैक्षणिक धोरणावर कडाडून टीका केली.
मोगलांनी भारतात हिंदू स्त्रियांवर बळजबरी केली, हिंदूची मंदिरे तोडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्त्रियांचे रक्षण करून हिंदू धर्माचे रक्षण केले. मोगल, ब्रिटिशांनी पाडलेली हिंदूची मंदिरे त्यांनी पुन्हा उभी केली. हा पराक्रमी इतिहास असताना "एनसीईआरटी'द्वारे मोगलांविषयी या पुस्तकात साठ ओळी लिहिल्या जातात तर, शिवाजी महाराजांच्या बाबतीत केवळ पाच ओळी लिहून इतिहासाची हत्या केली जाते, असा आरोप यावेळी धर्म शक्ती सेनेचे प्रमुख सदाशिव धोंड यांनी केला. हिंदूच्या महिलांवर बलात्कार करणारा, मंदिरे पाडणारा आणि गोहत्या करणाऱ्या अकबरला "अकबर द ग्रेट' म्हणून संबोधित केले जात असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. यावेळी मराप्रसचे रमेश नाईक यांनी सरकारवर कडाडून टिका केला.
राजकारणी हे नपुंसक बनले आहेत, त्यामुळे हिंदूंना हिंदुस्थानात आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्या दिव्य जागृती ट्रस्टचे अध्यक्ष तथा निवृत्त कॅप्टन दत्ताराम सावंत यांनी सांगितले.
सत्तेवर असलेले सरकार हे केवळ अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्यासाठीच सत्तेवर आहे. हे वादग्रस्त पुस्तक मागे न घेतल्यास गोवा शालान्त मंडळाच्या अध्यक्षांना चक्क साडी नेसवली जाणार असल्याचा इशारा यावेळी हिंदू महासभेचे शिवप्रसाद जोशी यांनी दिला.
दुर्बलता झटकून टाकण्यासाठी आणि पराक्रमी वृत्ती जागृत करण्यासाठी इतिहास शिकायचा असतो. मोगलांचा इतिहास शिकून पराक्रम जागृत होणार नसून उलट हिंदू धर्म अडचणीत येणार असल्याचे मत यावेळी एक पालक शुभा सावंत यांनी व्यक्त केले. येत्या शैक्षणिक वर्षात एनसीईआरटीचे एकही पाठ्य पुस्तक लागू होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी जयश्री गडेकर, मुख्याध्यापक उमेश नाईक, विद्यार्थी शौनक मराठे, मोहित थळी, शुभम परब, पूजा कदम व सनातन संस्थेचे घनश्याम गावडे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.

No comments: