Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 31 March, 2009

वरुण गांधींना जामीन, पण रासुकामुळे अडकले

उद्या"पिलिभित बंद'ची हाक
लखनौ, दि. ३० ः वरुण गांधी यांना वादग्रस्त भाषण प्रकरणात जामीन मिळाला आहे. जामीन म्हणून त्यांना २० हजार रुपये भरावे लागणार आहेत. मात्र जामीन मिळूनही रासुका लावण्यात आल्यामुळे वरुणला जेलमध्येच राहावे लागणार आहे.दरम्यान, १ एप्रिल रोजी पिलिभित बंदची हाक विश्व हिंदू परिषद व अन्य संघटनांनी दिली आहे. वरूण यांना "रासुका' लागू केल्याचा तीव्र निषेध भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केला आहे. व्यकय्या नायडू यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, रासुका लावताना उत्तर प्रदेश राज्य सरकारला लाज कशी वाटली नाही, असा संतप्त सवाल केला आहे.
पिलिभित येथे वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी वरुण यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा सेक्शन २ आणि ३ अंतर्गत शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांच्यात अडथळा निर्माण करण्याचा आरोप ठेवण्याचा निर्णय रविवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेश सरकारने घेतला. राज्याच्या डीजीपींनी तशी घोषणा केली आणि वरुण यांना तसे अधिकृतरित्या कळवण्यात आले. त्यामुळे जामीन मिळाला तरी वरुण गांधी यांना जेलमध्येच राहावे लागणार आहे.
राज्य सरकारने चार कारणे दाखवत वरुण गांधी यांना रासुका लावला आहे. पिलिभित येथे ७ मार्चला दोन गटांना चिथावणी देणारे भाषण करणे. त्यानंतर ८ मार्चला बरखेडा येथे एका विशिष्ट गटाला लक्ष्य करुन चिथावणी देणारे भाषण करणे ही दोन प्रमुख कारणे देण्यात आली आहेत. या कारणांना पोलिस आणि गुप्तचरांच्या रिपोर्टचा आधारदेखिल आहे.
वरुण यांनी पोलिसांना शरण येण्याआधी एक मिरवणूक काढली. या मिरवणुकीसाठी आधी जाहीर केलेला मार्ग बदलल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, असेही कारण रासुका लावण्यासाठी देण्यात आले आहे. तसेच जेलमध्ये जाण्यापूर्वी मिडियापुढे केलेल्या वक्तव्यामुळे समर्थकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली आणि शांतता भंग केली असे आणखी एक कारण पुढे करण्यात आले आहे.
हा तर कायद्याचा सरळसरळ
दुरुपयोगच : मनेका गांधी
बरेली(उ.प्र)ः वरुण गांधीविरुध्द राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करणे हा तर कायद्याचा सरळसरळ दुरुपयोग होय, असे सांगून वरुणची आई भाजपा खा. मनेका गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, अशाप्रकारे जर कायद्याचा दुरुपयोग केला जात असेल तर देशाच्या दृष्टीने ही धोकादायक बाब आहे.वरुणच्या बाबतीत जे काय घडले आहे ते त्याच्यावर अन्याय करणारे तर आहेच परंतु देशावरही अन्याय करणारे आहे. कारण अशा महत्त्वाच्या कायद्याचा दुरुपयोग करणे देशाच्या दृष्टीने धोकादायक ठरेल. बघुया पुढे काय होते ते. शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या वरुणची कारागृहात भेट घेतल्यानंतर मनेका बरेली येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
आता हे प्रकरण मी न्यायालयात तसेच जनतेसमोर नेणार आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, कॉंग्रेस व बसपा यांच्यात सुरू असलेली ही मतांसाठीची मारामारी आहे, असे म्हणता येईल. केंद्रातील कॉंगे्रस नेतृत्वाखालील सरकार व उत्तर प्रदेशातील मायावती यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुस्लिम मतदारांना आपल्याकडे ओढण्याचे हे राजकारण सुरू आहे, मतांचा हा गलबला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

No comments: